मुंबई – विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी असे पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविल्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दुसरीकडे या पदासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच कॉंग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रामुख्याने दोन नाव आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेनेने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला विरोध असल्याचे बोलले जात आहे. कॉंग्रेस जाहीर करणाऱ्या उमेदवाराला शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची पसंती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे तीनही पक्षांच्या समन्वय समिती नेत्यांच्या बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विधानसभा अध्यक्षपदी कोण बसेल याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी घेतील. लवकरच विधानसभा अध्यक्षाची घोषणी होईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने 23 जून रोजी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्यपालांकडे तीन प्रमुख मागण्या केल्या होत्या. यामध्ये विधानसभा अध्यक्षपदाचाही समावेश होते. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला पत्र लिहून विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार असे विचारल्याने यावरून पुन्हा राजकारण सुरू झाले आहे.
भाजपच कार्यालय थेट राजभवनातून – नाना पटोले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून सुरू असलेली टीकाटिप्पणी अजूनही सुरूच आहे. आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राजभवनमधून भाजपचे कार्यालय सुरू असल्याची खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे.