रायपूर – कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या छत्तिसगढमध्ये पुन्हा नेतृत्वबदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर, कॉंग्रेस श्रेष्ठींनी आदेश दिल्यास पायउतार होईन, या भूमिकेचा पुनरूच्चार मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी केला आहे.
कॉंग्रेसने डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारून छत्तिसगढची सत्ता मिळवली. त्यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच झाली. त्या पदासाठी पक्ष नेतृत्वाने बघेल यांना कौल दिला.
तेव्हापासूनच कॉंग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवल्याची चर्चा आहे. बघेल यांच्या कार्यकाळाला मागील महिन्यात अडीच वर्षे पूर्ण झाली. अशात ते रविवारी दिल्ली दौऱ्यावरून परतले. त्या दौऱ्यात बघेल यांनी कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेतली.
त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठीचा फॉर्म्युला पुन्हा चर्चेचा विषय बनला. पत्रकारांनी त्याविषयी विचारल्यावर बघेल यांनी जुनीच भूमिका मांडली. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी पद सोडण्यास सांगितले तर मी तसे करेल. संबंधित प्रश्न मला वारंवार विचारला जातो. त्यावर माझे एकच उत्तर आहे, असे ते म्हणाले.