नीरा – संपूर्ण देशात ही एक नंबरची निवडणूक मानली जात आहे. का तर, मोदी ज्या मतदार संघात उभे आहेत त्या मतदारसंघाची चर्चा नसून बारामती लोकसभा मतदार संघाची चर्चा अधिक आहे. आपण सगळ्या देशाला विचार करायला लावणारे लोक आहोत. तुम्ही बी भारी आणि मी बी भारी आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना बारामती लोकसभा मतदार संघातील मतदारांनी 23 तारखेला सुप्रिया सुळे यांना विजयी करून देशाला बारामतीची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
नीरा (ता. पुरंदर) येथील सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी प्रदीप गारटकर, जालिंदर कामठे, विश्वासनाना देवकाते, हरीश सणस, अशोक टेकवडे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, विजय कोलते, लक्ष्मणराव चव्हाण, डॉ. वसंत दगडे, कांचन निगडे, अनिल चव्हाण उपस्थित होते.
पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे देशाच्या प्रश्नावर बोलायचे सोडून महाराष्ट्रातील सभेत माझ्यावर टीका करीत आहे. ज्यांना कारखाना नीट चालविता येत नाही, शेतकऱ्यांना उसाचे पैसे देता येत नाहीत, कामगारांचे पैसे देता येत नाही ते देश चालवायला निघाले आहेत, असा टोला पवार यांनी कुल यांना लगावला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज एका महिलेच्या विरोधात देशातून एका पक्षाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, केंद्र सरकारमधील व राज्य मंत्रिमंडळातील मंडळी विरोधात भाषणासाठी येत असून याचा मला अभिमान आहे. हे लोक बारामती पाहण्यासाठी येत आहेत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
अभ्यास करून बोला…
पुरंदरच्या आत्ताच्या आमदारांना गुंजवणीचे पाणी देता देता दोन निवडणुका गेल्या तरी पाणी देता आले नाही. पुरंदर, बारामती, दौंडला मुळशी येथील स्वातंत्र्यपूर्व काळातील खासगी मालकीच्या टाटाच्या धरणातील पाणी देतो, अशा भूलथापा मारीत असून त्या धरणावर वीज निर्मिती होऊन ती वीज मुबई शहराला पुरविली जाते हे त्यांना माहिती नसून यासाठी लोकांच्या प्रश्नांबाबत अभ्यास करून बोलावे लागते, असा टोला आमदार विजय शिवतारे यांचे नाव न घेता पवार यांनी लगावला.