नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास २ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, आज दुपारी 12 वाजता शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा एकदा नव्याने बैठक पार पडणार आहे. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने नव्या कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती दिल्यानंतर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्या होणारी ही पहिलीच बैठक आहे.त्यामुळे या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवीन शेतकरी कायद्यांच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाने चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी कोर्टाने एक चार सदस्यीय समितीही स्थापन केली आहे. शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. अशातच आज शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक होणार आहे. ही शेतकरी आणि केंद्र सरकारमधील 9वी बैठक असणार आहे.
शेतकरी आणि केंद्र सरकारमधील याआधीची बैठक 8 जानेवारी रोजी पार पडली होती. परंतु, ही बैठक देखील निष्फळ ठरली होती. या बैठकीवेळी 15 जानेवारीला पुढील बैठक होणार असल्याचे सांगितले होते. मागील बैठकीत पुन्हा एकदा सरकारने शेतकरी नेत्यांसमोर कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
सरकारकडून असे म्हटले होते की, नवे कृषी कायदे मागे घेता येणार नाहीत, कारण बरेच शेतकरी त्यास अनुकूल आहेत. परंतु, नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.