– प्रा. रंगनाथ कोकणे
भारतात सुमारे 10 टक्के वनक्षेत्र असे आहे, जे वारंवार लागणाऱ्या वणव्यांनी होरपळत असते. ही बाब खुद्द सरकार मान्य करते.
नैसर्गिक कारणामुळे जंगलात वणवे लागण्याच्या घटना भारतात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आढळतात. परंतु मानवनिर्मित कारणांनी वणवे लागण्याच्या घटनांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळेच डोंगराळ भागात लागलेला वणवा नियंत्रणात आणणे हे दुहेरी आव्हान होऊन बसते.
वणव्यामुळे वनसंपदा तर नष्ट होतच आहे; शिवाय जनजीवनालाही धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील काही घरे आणि गुरेढोरेही या आगीत स्वाहा झाली आहेत. जंगलात आगी लागण्याच्या घटना नव्या नाहीत; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये वणवे लागण्याचे प्रमाण ज्या वेगाने वाढत आहे, तो नव्या संकटाचा इशारा देणारा आहे. हे संकट बिघडणाऱ्या पर्यावरण समतोलाचेही निदर्शक आहे. सामान्यतः जर आग जास्त पसरली नाही तर ती आपोआप विझते. परंतु जेव्हा वेगाने वारे वाहत असतात तेव्हा आग पसरण्याची प्रक्रिया रोखणे अशक्य बनते. उत्तराखंडमधील जंगलांत लागलेली आग बेकाबू होण्यामागे हेच कारण आहे. वनांमध्ये वाळलेले लाकूड, पाने आणि गवत असे अनेक घटक ठिणगीच्या संपर्कात येताच आग भडकते. मग झाडे पेट घेतात आणि मोठ्या वेगाने हा वणवा सर्वत्र पसरत जातो. डोंगराळ भागाचा भूगोल आणि भूरचना जटिल असल्यामुळेही वणवे विझविण्यात अडथळे येतात. याच कारणामुळे अनेकदा वणवा लागलेला लवकर कळतही नाही.
वनउपज आणि वन्यजीवांची तस्करी करणारे आणि भूमाफियाही जंगलात आग लावण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अनेकदा डोंगराळ भागांत आगीचा वापर करताना बेसावध राहिल्यानेही वणवा पेटतो. गेल्या पाच वर्षांत जंगलात आगीच्या घटनांमध्ये पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि हजारो कोटींचे नुकसान त्यामुळे झाले आहे. वणव्यांची समस्या ज्या वेगाने वाढत आहे, तो पाहता राज्य सरकारे आणि वनविभागाला आपल्या टेहळणी तंत्रात बदल घडवून आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
केवळ भारतातच नव्हे तर जगभरात जंगलातील वणव्यांचे प्रकार वाढत चाललेले दिसून येतात. 2020 मध्ये भारतात कमीत कमी 4 राज्यांत वणव्याच्या मोठ्या घटना घडल्या. सामान्यतः ज्या हंगामात आगी लागत नव्हत्या, अशा दिवसांमध्येही आगी लागत आहेत. जागतिक तापमानवाढ आणि त्याच्या परिणामांमुळेही जगभरातील वणव्यांची संख्या वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी उत्तराखंडमध्ये हिवाळ्यात वणव्याच्या सर्वाधिक घटना घडल्या. या राज्यात 1 ऑक्टोबर ते 4 जानेवारी यादरम्यान आगीच्या 236 घटना घडल्या आणि संपूर्ण वर्षभरात एकंदर साडेचार लाख कोटींचे नुकसान झाले. उडिशामधील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान, हिमाचल प्रदेशातील कुल्लू क्षेत्र आणि नागालॅंड-मणिपूरच्या सीमेव्यतिरिक्त उत्तराखंडच्या नैनिताल भागात जंगलांमध्ये आगी लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. घटनांच्या संख्येबरोबरच आगीचे स्वरूपही भीषण होत चालले आहे.
2019-20 मध्ये ऑस्ट्रेलियात भडकलेल्या वणव्यात 300 कोटी पशुपक्षी होरपळले होते. अमेझॉनच्या जंगलात अशीच प्रचंड मोठी आग भडकली होती आणि ती विझण्यास अनेक दिवस लागले होते. जंगलविषयक तज्ज्ञांच्या मते, वर्षातील काही महिने जंगलात वणवे लागणे स्वाभाविक असते. विशेषतः उन्हाळ्यात अशा आगी लागतात. पठारी प्रदेशात फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात आणि डोंगराळ भागात मार्चच्या उत्तरार्धात जंगलांमध्ये आगी लागल्याच्या घटना पाहायला मिळतात. पुढील काही दिवस अशा घटना घडत राहतात. परंतु उन्हाळ्याच्या या दिवसांव्यतिरिक्त अन्य महिन्यात म्हणजे डिसेंबर, जानेवारीत जर आगी लागत असतील तर त्या अनैसर्गिक मानल्या जातात. जंगलांत आगी लागण्याचे प्रमुख कारण म्हणजे माणसांचा बेजबाबदारपणा.
आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चराऊ कुरणे म्हणजे ग्रासलॅंड नसणे हे मानवनिर्मित आगीचे महत्त्वाचे कारण ठरते. युरोप आणि उत्तर आशियात स्टीप, हंगेरीत पुस्ता, अमेरिकेत प्रायरीज, अर्जेंटिनात पम्पास, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात सवाना तसेच न्यूझीलंडमध्ये कॅन्टबेरी ही प्रमुख ग्रासलॅंड आहेत. भारतात राजस्थानातील काही प्रदेश किंवा अतिशय उंचावरील काही प्रदेशात असे गवताळ प्रदेश आढळतात. ग्रासलॅंड कमी असल्यामुळे पशुपालकांचे त्यावरील अवलंबित्व वाढते. उन्हाळ्यात जेव्हा सर्वकाही सुकून जाते, तेव्हा गवत जाळून त्याजागी नवीन हिरवे गवत उगवून येईल, अशा मानसिकतेतून आगी लावल्या जातात. पशुपालनावर अवलंबून असलेल्या लोकांच्या या समस्येकडेही जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. हिवाळ्याच्या दिवसांत जर आग लागली तर ते चांगले लक्षण नव्हे. जंगलात जर आग लागली आणि नियंत्रणात असेल तर फायद्याची ठरते; मात्र ती फैलावली तर त्यामुळे होणारे नुकसान थोडेथोडके नसते, असे तज्ज्ञ सांगतात.
आगी नियंत्रणात आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा कोट्यवधींची वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडेलच; शिवाय विविध प्रकारचे जीव असेच होरपळून जात राहतील.