कोलकाता: देशाची अर्थव्यवस्था आज अडचणीत आली असून त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. त्यामुळे त्या स्थितीवर मात करण्यासाठी मोदी सरकारने विरोधकांशी सल्लामसलत करावी आणि त्यांना बरोबर घेऊन या स्थितीवर मात करावी, त्यांनी द्वेषाचे राजकारण करणे आता सोडून द्यावे अशी सुचना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही सुचना केली.
त्या म्हणाल्या की भारताच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या संबंधात रिझर्व्ह बॅंकेने गंभीर इशारा दिला आहे आणि केंद्र सरकारने तो गांभीर्याने घेतला पाहिजे. द्वेषाच्या राजकारणात गुंतण्यापेक्षा सरकारने आता यावर अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. देशातील प्रत्येक घटकाला मदतीला घेऊनच सरकारला या समस्येतून वाट काढावी लागेल त्यासाठी विरोधी सदस्यांचे सल्लेही त्यांनी विचारात घेतले पाहिजेत असे त्या म्हणाल्या. देशाच्या संबंधात महत्वाचे निर्णय घेताना केंद्र सरकार आता राज्यांशीही विचारविनीमय करीत नाही असा आरोपही त्यांनी केला.