मुंबई : ज्येष्ठ कवी लेखक जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन देशभरातील रान उठले आहे. त्यातच आता आज भाजपा आमदार नितेश राणे यांनी अख्तर यांनी इशारा दिला आहे. आठवड्याभरात जाहीरपणे चर्चा करा किंवा माफी मागा, असे आव्हान राणे यांनी दिले आहे.
जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद सध्या सर्वत्र उमटत आहेत. यावरच प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना जाहीर पत्र लिहिले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ते शेअरही केले आहे.
My open letter to @Javedakhtarjadu
I am giving u 1 week’s ultimatum: either u decide a public platform or Newsroom to have a debate to justify what u have said,v are ready to ans all ur hatred n misconceptions or otherwise u release an unconditional apology to all Hindus. pic.twitter.com/pmTaASg2Q8— nitesh rane (@NiteshNRane) September 6, 2021
आपल्या ट्विटमध्ये राणे यांनी, “मी तुम्हाला एका आठवड्याचा अल्टिमेटम देत आहे. एक तर तुम्ही सार्वजनिक मंचावर अथवा माध्यमांसमोर येऊन तुमच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण द्या. आम्ही तुमच्या सर्व द्वेष आणि गैरसमजांना उत्तर देण्यासाठी तयार आहोत. किंवा तुम्ही सगळ्या हिंदुंची बिनशर्त माफी मागू शकता” म्हटले आहे.
अख्तर यांच्या या वक्तव्याचा सर्वच पक्षांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित करतानाच मागच्या काळात ‘बीफ’ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेनाच काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केलेले नाही, असे म्हणत अख्तर यांनी तालिबानशी केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही चुकीचे असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. यावरुनच आता भाजपाचे आमदार राम कदम यांनी थेट जावेद अख्तर यांच्या अटकेची मागणी केली आहे.