नवी दिल्ली : एनसीआर सोडून देशभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. ही सूट सशर्त असणार आहे. ही सूट त्याच भागांमध्ये असणार आहे ज्याठिकाणी कोरोनाचे संक्रमण झाले नाही. याच दरम्यान नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाने आजपासून टोलवसुली सुरु केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली होती. तेव्हापासून टोलवसुली बंद होती. दिल्लीमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट देण्याबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. लॉकडाऊनमध्ये आजपासून जी सूट देण्यात आली आहे त्यामध्ये फलोत्पादन, मत्स्यपालन आणि पशुपालन यांचा समावेश आहे. त्यासोबत इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार काम करणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे.
काही राज्यांमध्ये सरकारी कार्यालय सुरु होणार आहेत. कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित झालेल्या महाराष्ट्रात काही उद्योगधंदे सुरु होणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर घोषीत करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे २५ मार्चपासून राष्ट्रीय महामार्गावर टोलवसुली बंद करण्यात आली होती. नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाने आजपासून टोलवसुली सुरु केली आहे. हरियाणातील गुरुग्राम टोलनाका, चेन्नई येथील पोरुर टोलनाका आणि महाराष्ट्रातील वाशी टोलनाक्यावर टोलवसुली सुरु झाली आहे.