पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. या कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्यासाठी आता नियम भंग करणाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन कापण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
परीक्षा परिषदेत कायमस्वरुपी अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करून भरमसाठ खर्च करण्याऐवजी कंत्राटी तत्त्वावरच ते मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरूच आहे. सद्य:स्थितीत कंत्राटी 34 लिपिक कार्यरत आहेत. याशिवाय शिपाई, वाहनचालक, सुरक्षारक्षक, प्रोग्रॅमर, सफाई कामगार असे 31 जण आहेत. सेवानिवृत्ती अधिकारी 3 आहेत. या सर्वांच्या वेतनावर दरमहा 11 लाख रुपयांचा खर्च होतो.
आयुक्त व अध्यक्ष, उपायुक्त, सहायक आयुक्त, अधिक्षक असे शासनाने 10 बडे अधिकारीही पूर्णवेळ कार्यरत आहेत. इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, डी.एल.एड, संगणक टायपिंग व मॅन्युअल टायपिंग परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेश पात्रता परीक्षा, विभागीय सेवा प्रवेशोत्तर परीक्षा आदी परीक्षांचे कामकाज परिषदेमार्फत चालते. यासाठी कंत्राटी अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात.
काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयाबाहेर जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब कार्यालयीन शिस्तीस धरून नाही, असे नमूद करत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कार्यालयीन शिस्तिबाबातचे आदेश दिले आहेत. भोजनाच्या वेळेव्यतिरिक्त इतर कार्यालयीन वेळेत कार्यालयाच्या बाहेर जाऊ नये. अत्यावश्यक असल्यास संबंधीत विभागप्रमुखांची परवानगी घेऊन सुरक्षा रक्षकाकडील नोंदवहीत नोंद करूनच बाहेर पडावे. नियमांचे पालन न केल्यास संबंधिताचे दिवसाचे वेतनच अदा करण्यात येणार नाही.