नागपुर – नागपुरच्या मिहान प्रकल्पात राज्य सरकारतर्फे सोळाशे कोटी रूपये खर्चुन एक आपत्ती निवारण केंद्र उभे केले जात आहे अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडवेट्टीवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
ते म्हणाले की हे केंद्र मिहान प्रकल्पातील दहा एकर जागेत उभे राहणार असून येत्या दीड वर्षात ते कार्यरत होईल अशी माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले की या केंद्रातून चक्रीवादळ आणि अन्य नैसर्गिक आपत्तींची आगाऊ माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
तसेच त्यामुळे प्रत्यक्ष आपत्तीच्या ठिकाणी योग्य नियोजन करून यंत्रणा उभारण्यासहीं हातभार लागणार आहे. नैसर्गिक आपत्तींमध्ये शेती क्षेत्राचे मोठे नुकसान होते. या नुकसानग्रस्त भागांचे मॅपिंग आणि सर्वेक्षणाचे कामही या केंद्राच्या मदतीने केले जाणार आहे असे ते म्हणाले.
वडवेट्टीवार यांनी यावेळी मुंबईत पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही माहिती दिली. ते म्हणाले की मुंबईच्या विविध भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे जी पडझड झाली त्यात एकूण 25 जण दगावले आहेत. त्यातील काही दुर्घटनाग्रस्त भागात तेथील नागरीकांना या आधीच सावधगिरीच्या सुचना देण्यात आल्या होत्या. पण अशा धोक्याच्या इशाऱ्यांकडे नागरीकांकडून फार गांभीर्याने लक्ष दिले जात नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.