जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास कारवाई
सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 लागू झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शेखर सिंह यांनी एका आदेशान्वये घोषित केले आहे.
या आदेशानुसार पूर्वतयारीसाठी व प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी खपलळवशपीं उारपवशी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडकरी, (मो. 9422471912, ईमेल – लीीीरींरीरऽीशवळषषारळश्र.लो) व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये (मो. 9421233250, ईमेल – वहिूीेरींरीऽसारळश्र.लो) यांना सनियंत्रक म्हणून घोषित केल्याची माहिती शेखर सिंह यांनी दिली. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येऊ नये. यापूर्वी परवानगी देण्यात आली असल्यास ती रद्द करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत करोना विषाणूबाधित रुग्ण आढळत आहेत. विदेशातून आलेले आणि देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करत असल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाल्याचे शेखर सिंह यांनी आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तथा दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यासाठी आणि फक्त विधिवत पूजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत करून तसे अधिकार तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले आहेत; परंतु अशा प्रकारची परवानगी देताना पोलीस व आरोग्य विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे अवश्यक आहे. या आदेशाचे उल्लंघन करून गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित व्यक्ती, संयोजकांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 43 अन्वये कारवाई करण्यात येईल. त्यासाठी सर्व तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्यास अन्य व्यक्तीस होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लोकांचा मोठा समूह एकत्र येऊ नये म्हणून जिल्ह्यात सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, यात्रा, ऊरुस, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांवर आजपासून पुढील आदेश होईपर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. यापूर्वी परवानगी देण्यात आलेले कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यात्रा, ऊरुस, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरूंना विधिवत पूजा किंवा परंपरेने करायचे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थित करण्यास आणि खासगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरूपात करण्यास बंदी राहणार नाही; परंतु या दोन्हीबाबत आरोग्यविषयक सुरक्षा पाळणे बंधनकारक राहील. सर्व शासकीय यंत्रणांनीही सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, ऊरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांना त्यांच्या स्तरावर परवानगी देऊ नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
अबुधाबीवरून आलेला संशयित रुग्ण साताऱ्यात विलगीकरण कक्षात दाखल
अबुधाबी येथून सातारा जिल्ह्यात आलेल्या एका 30 वर्षीय तरुणाला खोकला, ताप आणि छातीत दुखत असल्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील करोना विषाणूबाधितांसाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात तातडीने दाखल करण्यात आले आहे. या संशयित रुग्णाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, अबुधाबीवरून आलेल्या या तरुणाला केवळ संशयावरून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. जिल्ह्यात करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्षता घेत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनीही जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.