डेहराडून – देशात कृषी विधेयकांना होत असलेल्या विरोधामागे एकाच पक्षाला आलेले नैराश्य आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. कृषी सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक शेतकरीविरोधी असून, त्यांना दलालांचा विकास हवा असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
कॉंग्रेसचा उल्लेख न करता गेल्या चार पिढ्यांपासून देशावर राज्य असलेला पक्षच या विरोधाच्या मूळाशी असल्याची ही टीका मोदींनी केली. ते आज उत्तराखंडमधे “नमामी गंगे मोहिमे’अंतर्गत 6 मोठ्या योजनांचा दूरदृश्य संवाद पद्धतीने प्रारंभ केल्यानंतर बोलत होते.
विरोधकांना केवळ राजकारण करण्याचा एकच मार्ग मिळाला असून तो म्हणजे विरोध करणे हाच आहे. कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्यांचा हेतू सदोष आहे. काही लोक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करत आहेत, ते शेतकऱ्यांसोबतही नाहीत आणि सैनिक किंवा तरुणांसोबतही नाहीत.
देशातील एकाच पक्षाने जन धन खाती, जीएसटी, वन रॅंक वन पेन्शन, राफेल, स्टॅच्यू ऑफ युनिटी, आर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणापासून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यासही विरोध केला आहे.
चार पिढ्या सत्तेत घालवल्यानंतरही दुसऱ्याच्या खांद्यांवर आरुढ होणे संपल्यामुळे आलेले नैराश्यच या विरोधामागील खरे कारण आहे. या नव्या कायद्यांमुळे अनेकांचा काळा पैसा कमावण्याचा मार्ग बंद होणार असल्याने, ते या कायद्यांना विरोध करत असल्याचे, मोदी यांनी नमूद केले.
दरम्यान, नमामी गंगे अभियान हे देशातले सर्वात व्यापक नदी संरक्षण अभियान असल्याचे, ते म्हणाले. जलजीवन मिशनच्या बोधचिन्हाचे तसेच या मिशनअंतर्गत ग्रामपंचायती तसेच पाणी समित्यांसाठीच्या मार्गदर्शिकेचंही मोदी यांनी अनावरण केले.