इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यात उत्पादनात होणार घट
हरभऱ्याचा हमी भाव यंदा 4830 रुपये; आयात धोरणाचा होणार परिणाम
रेडा (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरा केलेल्या हरभऱ्याला बदलत्या वातावरणाचा फटका जोरदार बसला आहे. त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाचे हरभऱ्या संदर्भातील आयात धोरणामुळे इंदापूर, बारामती, दौंड या तालुक्यातील शेतकरी चिंतातुर झाला आहे.
गेल्यावर्षी 4620 रुपये प्रतिक्विंटल शासनाचा हमीभाव होता. तर खासगीत साडेचार हजार रुपये किमतीने देखील हरभरा विकला गेला. यावर्षी शासनाने हरभऱ्याचा हमीभाव 4830 रुपये ठेवला आहे. मात्र हंगामाच्या आरंभी हा भाव अवघ्या 3 हजार 500 रुपयाने चाललेला दिसतो आहे. ही हरभऱ्यातील मंदी विक्री करताना कायम राहिली तर, सध्याचे दर देखील स्थिर राहतील असे संकेत विश्वसनीय सूत्रांकडून वर्तवले जात आहेत. त्यामुळे यंदा हरभरा शेतकऱ्यांची निराशा करणार हे चित्र स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांना गतवर्षी हरभरा विक्रीतून मिळालेली रक्कम व हरभऱ्याला असलेला दर रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पोषक वातावरणाचे चित्र असल्याने, शेतकऱ्यांनी इंदापूर, बारामती व दौंड या तीन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी केली. अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस लांबल्यामुळे जमिनीमध्ये ओल खोलवर होती. यामध्ये कोरडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. दरम्यान पेरणीनंतर हवामानात झपाट्याने बदल होत गेला.
सतत ढगाळ हवामान व सातत्याने पडणाऱ्या धुक्यामुळे हरभऱ्याची वाढ कोणत्याही शेतकऱ्यांच्या शेतात पुरेपूर झालेली बघायला मिळत नाही. खऱ्या अर्थाने हरभऱ्याची वाढ न झाल्यामुळे घाटे तयार होण्यासाठी फुलांची संख्या ही कमीच लागली. यावर घाटे आळीने प्रार्दुभाव केला. त्यामुळे काही प्रमाणात आलेल्या घाटे आळीने घाटे खाऊन टाकलेला दिसतो. त्यामुळे शेतकऱ्याला मिळणाऱ्या हरभरा उत्पन्नात घट होणार आहे. हे मात्र निश्चित आहे.
व्यापाऱ्यांचे लक्ष शासकीय खरेदीवर
शासन गेल्या तीन वर्षांपासून हमी भावात खरेदी केलेल्या तूर व हरभऱ्याची निविदाद्वारे हमीभावापेक्षा कमी दरात विक्री करत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना आपसूकच अत्यंत कमी दरात हे दोन्ही वाण मिळत असल्याने त्यांचा खासगी खरेदीवर जोर दिसत नाही. लहान-मोठे व्यापारी गरजेपुरता शेतीमाल खरेदी करत आहेत. बड्या व्यापाऱ्यांचे लक्ष शासनाच्या खरेदी-विक्रीवर आहे. याचा परिणाम शेतीमालाच्या किमतीवर होताना दिसत आहे.
शासनाने हमी भावातून शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे. शेतकरी रात्रंदिवस शेतीमध्ये राबत असतो, मात्र मिळणारे उत्पन्न अगदी तोटके असते. उत्पन्न मिळत नसल्याने शेती परवडणारी नाही, हा समज नव्या शेतकऱ्यांमध्ये पसरत आहे. हरभरा अधिक दराने विक्रीला सातत्याने लगाम लागत गेला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.
-विलासराव वाघमोडे, आदर्श शेतकरी.