मुंबई – इशांत शर्मा व महंमद सिराज यांनी थोडी जिद्द दाखवली असती तर माझ्या मुलाचे शतक पूर्ण झाले असते. त्यांनी खेळपट्टीवर उभे राहण्याची धमकच दाखवली नाही. त्यांच्या याच नाकर्तेपणामुळेच माझ्या मुलाचे शतक अपूर्ण राहिले, अशा शब्दांत वॉशिंग्टन सुंदरचे वडील एम. सुंदर यांनी आपला संताप व्यक्त केला.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात सुंदरने अविश्वसनीय खेळी केली. ऋषभ पंत शतकी खेळी करून बाद झाल्यानंतरही सुंदरने जिद्दी वृत्ती दाखवून संघासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, त्याला साथ देण्याची कुवत इशांत व सिराजने दाखवलीच नाही.
खरेतर त्यांनी जिद्दीने खेळपट्टीवर उभे राहिले पाहिजे होते. जर एखाद्या सामन्यात संघाला विजयासाठी दहा धावा असतील तर हेच दोन फलंदाज खेळपट्टीवर असले तर आपण विजयाची अपेक्षा बाळगू शकतो का, असा संतप्त सवालही त्यांनी केला.
या सामन्यात इशांत व सिराज यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर टिच्चून खेळत उभे राहण्याची जिगरच दाखवली नाही. ते दोघे लवकर बाद झाल्यामुळेच माझ्या मुलाचे शतक पूर्ण होऊ शकले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.