चंदीगड- पंजाब कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेद कॉंग्रेस पक्षाच्या गळ्यात अडकलेला काटा ठरत आहे. त्याचे कारण त्या राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि बंडखोर नेते व दोनच दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झालेले नवज्योत सिंग सिध्दू यांचे मतभेद मिटले असल्याचे भासवले गेले असले तरी मनभेद अद्याप कायम असल्याचे निदर्शनास येते आहे. त्याचे कारण म्हणजे तेथे नव्याने रंगलेले माफीनाट्य.
भाजपमधून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले सिध्दू सुरूवातीपासून अमरिंदर यांच्यावर नाराज आहेत. त्याची कारणे जरी त्यांनी बोलून दाखवली नसली तरी त्यांना कुठेतरी आपल्याला डावलले गेले असल्याची बोच आहे. त्यांना प्रदेशाध्यक्ष पद हवे असल्याची चर्चा बरेच दिवस सुरू होती. ते त्यांना देण्यातही आले.
आता सगळे मतभेद संपले असल्याचे मानून कॉंग्रेस पक्षानेही सुटकेचा निश्वास टाकला. सिध्दू यांनी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधी यांची सिध्दूंची भेट घेण्याची इच्छा नव्हती. मात्र प्रियांका यांच्या शिष्टाईनंतर राहुलही सिध्दूंना भेटले आणि त्यांची पक्षातील उंची पुन्हा वाढवण्यात आली.
सगळे एकोप्याने काम करतील असे पक्षाचे पंजाब प्रभारी हरिश चावला यांनीही ग्वाही दिली. मात्र तसे होत नसल्याचे दिसते आहे.
त्याचे कारण म्हणजे सिध्दू यांनी जाहीरपणे आपली माफी मागावी अशी मागणी अमरिंदर यांनी केल्याची बातमी होती. तर आता सिध्दूंनी नाहीतर अमरिंदर यांनीच माफी मागावी अशी मागणी सिध्दूंच्या गटाकडून केली जाते आहे. त्यावरून नाराजीचा नवा अंक सुरू झाला आहे.
पक्षाने लोकांना गेल्या निवडणुकीत जी आश्वासने दिली होती. ती पूर्ण केली नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्रीच याला जबाबदार असून त्यांनी माफी मागावी असे सिध्दू गटाचे म्हणणे आहे. ते मुख्यमंत्र्यांच्या गटाला अर्थातच अमान्य आहे.
बैठकीचे निमंत्रण नाही
दरम्यान, अमरिंदर यांनी उद्या म्हणजे बुधवारी पक्षाच्या सर्व आमदारांना आणि खासदारांना भोजनासाठी बोलावले आहे. एकप्रकारे त्यांनी हे बैठकीचेच आमंत्रण दिले आहे. मात्र यातला सगळ्यांत महत्वाचा भाग म्हणजे सिध्दू यांनाच प्रदेशाध्यक्ष असूनही या बैठकीला बोलावण्यात आलेले नाही. त्यामुळे कॉंग्रेसमधील ही दिलजमाई काही झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.