सातारा – मी कायम जनतेच्या सुखदुःखात असतो म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय, पण तुमच्या या नाकर्तेपणामुळेच जनतेने तुम्हाला पाच पैकी चार वेळा म्हणजे तब्बल 20 वर्ष नाकारले आहे, असा टोला आमदार मकरंद पाटील यांनी मदन भोसले यांना लगावला. वाई येथील फुलेंनगर आणि रविवारपेठ याठिकाणी झालेल्या सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते प्रतापराव पवार, वाईचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक भूषण गायकवाड, आप्पा लोळे, दादा अडसूळ, किशोर कांबळे, शिवाजी जमदाडे, यशवंत सपकाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आ. मकरंद पाटील म्हणाले, वाई शहारातील नागरिकांनी सांगितलेली अनेक विकासकामे आपण मार्गी लावली आहेत. स्विमिंग पूल, नगरपालिकेची इमारत, झोपडपट्टीचा विकास, रस्ते, पाणी योजना,छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, ज्या दवाखान्याची अजित दादांनी प्रशंसा केली तो पशु वैद्यकीय दवाखाना अशी कोट्यवधी रुपयांची असंख्य कामे मी केली आहेत.
एवढं करूनही मी सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात कायम त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे आणि यापुढेही राहणार. पण विरोधकांना माझा जनसंपर्क आवडेनासा झाला आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, तुम्हालासुद्धा इथल्या जनतेने एकदा संधी दिली पण दुर्दैवाने तुम्हाला काहीच जमल नाही. तुमच्या नाकर्तेपणामुळे तुम्हाला जनतेने पाच पैकी चार निवडणुकीत म्हणजेच तब्बल 20 वर्ष नाकारले आहे.तरीही तुम्ही फक्त निवडणूक आली की बाहेर पडता असा टोला यावेळी मकरंद पाटील यांनी मदन भोसले यांना लगावला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव पवार म्हणाले, एक लागलेली निवडणूक आहे आणि एक लादलेली निवडणूक आहे. मदन भोसले बोलत आहेत की कवठे येथील किसनवीर स्मारकाची काय अवस्था केलीय त्यावर मी म्हटल त्याचा अध्यक्ष तुमचे पिताजी आहेत, त्यामुळे त्यांनाच विचारा. भाजपमध्ये गेला की हा बेटा बोलतोय कॉंग्रेसने काय केलं? मी बोललो तुझ्या बापाला आमदार, खासदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष केलं. कुठलंही काम करायचं नाय अशा क्रियानिष्ठ माणसाबरोबर आपल्याला लढायचं आहे. खोटी आश्वासन, खोटी भाषण, खोट्या जाहिराती करून हे लोक प्रचार करताहेत. कुठून आले हे पैसे असा सवाल ही याप्रसंगी प्रतापराव पवार यांनी विचारला.
उपनगराध्यक्ष अनिल सावंत म्हणाले, सेमी ऑलिम्पिकच्या दर्जाचा स्विमिंग पूल आबांनी वाईमध्ये बांधला. कोर्टाशेजारी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आबांच्या कल्पनेतून उभारला जातोय. पण मदन भोसले स्वतः निष्क्रिय असून खोटं बोलून ते सर्व लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. याप्रसंगी वाई शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.