भरतीप्रक्रिया तीन वर्षांपासून बंद : सेविकांसह, मदतनिसांची पदे रिक्त
मोरगाव (वार्ताहर) – अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरतीप्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. या बंद भरती प्रक्रियेमुळे बारामती तालुक्यात अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे अंगणवाडीतील चिमुकल्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहावे लागत असून बंद असलेली भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
राज्यात गेल्या तीन वर्षापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांची भरती प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत अनेक पदे रिक्त झाली असून, त्याठिकाणी नवीन नेमणुका होणे गरजेचे आहे; परंतु या पदांच्या भरती प्रक्रियेबाबत शासन दरबारी उदासीनता असून ठोस सकारात्मक निर्णय होत नसल्याने ग्रामीण भागातील पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रिक्त पदांचा बारामतीच्या ग्रामीण भागात फटका बसला असून शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू करण्याआधीच हक्काच्या शिक्षणापासून पोरके व्हावे लागत आहे. तालुक्यात प्रकल्प एक अंतर्गत सुमारे 253 अंगणवाड्या असून प्रकल्प 2 मध्ये त्यांची संख्या 164 एवढी आहे.
सध्या प्रकल्प एक अंतर्गत 13 अंगणवाडी सेविका व 31 मदतनीस ची पदे रिक्त असून, प्रकल्प अंतर्गत 12 सेविका व 9 मदतनीसची पदे रिक्त आहेत. त्यामुळे केवळ एकट्या बारामती तालुक्यात अंगणवाडी सेविकांची 25 तर मदतनिसांची 40 पदे सद्यस्थितीला रिक्त आहेत. तसेच या बरोबर प्रकल्प एक मधील मंजूर दहा पर्यवेक्षिकांपैकी एक पद रिक्त असून प्रकल्प दोन मधील सहा 6 पैकी एक पद रिक्त आहे. तसेच प्रकल्प एकअंतर्गत 10 मिनी अंगणवाडी असून, त्याही ठिकाणी काही पदे रिक्त आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पदे रिक्त असल्याने अनेक अंगणवाडी शाळांना शिक्षिका नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
राज्य शासनाकडून या भरती प्रक्रियेवर ठोस उपाययोजना होत नसल्याने व भरती प्रक्रिया बंद असल्याने अनेक अंगणवाड्या शिक्षिकाविना आहेत. काही अपवादात्मक ठिकाणी ग्रामपंचायतीने आपल्या पातळीवर मानधन देऊन तात्पुरती भरती केली आहे. तालुक्यातील 25 हून अधिक अंगणवाडी शाळातील विद्यार्थी आता हक्काच्या शिक्षिकेच्या प्रतिक्षेत आहेत. पंचवीस अंगणवाडी सेविका व 40 मदत दिवसांच्या भरतीअभावी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची पोषण आहाराअभावी हेळसांड होऊन होत असून तातडीने अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी होत आहे.
शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती प्रक्रिया बंद केल्याने सेविकांची 25 तर मदतनिसांची 40 पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यात प्रशासकीय कामकाज करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही भरती प्रक्रिया सुरू झाल्यास कामकाज करणे अधिक सोपे जाईल.
-मिथुन नागमवाड, बाल विकास प्रकल्प अधिकारी बारामती.