मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आक्रमक पावित्रा घेतला होता. या संदर्भात राठोड यांची प्रतिक्रिया आली असून त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली आहे.
पूजा चव्हाण प्रकरणाच्या मदतीने समाज माध्यमातून, प्रसार माध्यमातून बंजारा समाजाची आणि माझी प्रतीमा खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पूजा चव्हाणच्या प्रकरणाचा तपास व्हावा आणि सत्य बाहेर यावी ही आपली इच्छा असल्याचं संजय राठोड यांनी म्हटलं आहे. राठोड याच्या राजीनाम्याने महाविकास आघाडीची पहिली विकेट पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा विधानसभेचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. यावर संजय राठोड यांनी टीका केली. अधिवेशन चालू देणार नाही, ही विरोधकांची भूमिका घटनेच्या विरोधात असल्याचं राठोड यांनी म्हटलं आहे.