मुंबई – बॉलिवूडमध्ये सध्या हिट फॉर्म्युलाची मोठी चालती आहे. भाषा,माध्यम कोणताही असो जर तो फॉर्म्युला हिट आहे तर बॉलिवूडमध्ये त्यावर कितीही पैसे लावला जातो. म्हणूनच अनेकदा नवीन कथा बनवण्यापेक्षा निर्मात्यांचा कल चित्रपटांचे रिमेक करण्यावर अधिक असलयाचे दिसून येते. आता यावरूनच प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांनी सिनेसृष्टीवर सडकून टीका केली आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये झा यांनी बड्या स्टार्सवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले.
प्रकाश झा यांनी राजकीय पार्श्वभूमी असलेले अनेक चित्रपट केले आहेत. ज्यात राजनीती, अपहरण गंगाजल अशा अनेक हिट सिनेमांचा समावेश आहे. एका मुलाखतीदरम्यान झा यांना बॉलिवूड चित्रपटाच्या सध्याच्या हालतबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर बोलताना त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं. ते म्हणाले, बॉलिवूडचे स्टार्स पान गुटखा विकतात आणि वेळ मिळाला की चित्रपटांचा रिमेक करतात.
स्टार्स मंडळींना हे समजायला हवं की, लोकांनी तुम्हाला स्टार बनवलं आहे. एकदिवस हेच लोक तुम्हाला जमिनीवर आपटतील, असं स्पष्ट मत प्रकाश झा यांनी व्यक्त केलं. साऊथचे लोक नवनवे प्रयोग करत आहेत. दर्जेदार कथा लोकांसमोर आणत आहेत. बॉलिवूडचे लोक काय करत आहेत? ते फक्त रिमेक बनवण्यात मश्गुल आहेत, असंही प्रकाश झा म्हणाले. यापूर्वी झा यांनी लाल सिंग चड्डा या सिनेमावर देखील चांगलीच टीका केली होती.