मुंबई : अर्थसंकल्पात आकडे फेकण्यापलिकडे काहीही नवे नाही. केंद्र सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली असून आजचा अर्थसंकल्प म्हणजे दिशाहीन अर्थ”शून्य’ संकल्प आहे. मोदी सरकारचा अर्थसंकल्प फक्त हेडलाईन मॅनेजमेंट करणारा आहे, यातून सर्वसामान्य जनतेला ठोस काही मिळाले नाही. या अर्थसंकल्पात महाराष्ट्र कोठे आहे? सर्वाधिक कर देणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्राची घोर निराशा केली आहे.
– बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री
यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे “जुमलेनॉमिक्स’ आहे. अर्थसंकल्पात बेरोजगारीसारख्या ज्वलंत समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. उत्पादकतेला चालना देण्यात आली नाही. गरीब, मध्यमवर्गीय, नोकरदार यांचे उत्पन्न आणि क्रयशक्ती वाढविण्याचा प्रयत्न झाला नाही. मुंबईतील इंटरनॅशनल फायनान्स सेंटर गुजरातला नेण्याची अधिकृत घोषणा या अर्थसंकल्पात झाली आहे. मुंबईचे महत्व कमी करण्याचा हा घाट आहे.
– अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री
देशाची अर्थव्यवस्था आधीच गोंधळलेली त्यात गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प मांडला. देशात मंदीचे वातावरण आहे, त्यासाठी अर्थसंकल्पात काहीच नाही. मंदीतून देश बाहेर काढण्यात अर्थमंत्र्यांना अपयश आले आहे. तसेच एलआयसीचे खासगीकरण करण्याची सरकारची मानसिकता दिसून येत आहे.
– जयंत पाटील, जलसंपदा मंत्री