शिष्यवृत्तीसाठी अर्ज वाटप सुरू, संपर्क साधण्याचे आवाहन
पुणे – दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महाराष्ट्रातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना बारावीनंतरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारण्यात येत असून, दि. 15 ऑगस्टपर्यंत गरजू विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन दिशा परिवाराने केले आहे.
ज्या विद्यार्थ्याला आई, वडील नाहीत; तसेच अल्पभूधारक अल्प उत्पन्न गटातील पालकांच्या मुलांना प्राधान्याने मदतीचा विचार केला जाईल, अशी माहिती ट्रस्टचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी दिली. दिशा परिवाराच्यावतीने गेल्या 15 वर्षांपासून महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यासाठी बारावीनंतरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आर्थिक मदत करीत आहे. या उपक्रमामुळे मागील 15 वर्षांत 4 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत मिळाली असून, त्यांच्या शैक्षणिक कार्याला हातभार लागला आहे.
ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने इयत्ता बारावीच्या परीक्षेत किमान 80 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग या शाखेतील विद्यार्थ्यांना संस्थेकडे उपलब्ध निधीनुसार मदत दिली जाईल. त्याकरीता दि. 15 जुलै ते 15 ऑगस्ट याकाळात सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत विनामूल्य अर्ज मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी 9423492233 किंवा 7020908625 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज कोठे मिळेल?
शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी हा अर्ज दि. 15 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत संस्थेच्या सरोज भवन, विद्यार्थिनी वसतिगृह, बालाजी पार्क, लाईन नंबर 3, शाहू बॅंकेजवळ, केसनंद रोड, वाघोली येथे मिळेल, अशी माहिती ट्रस्टचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी दिली.