नवी दिल्ली – 8 सप्टेंबरपर्यंत देशातील प्रत्यक्ष कर संकलन 35 टक्क्यांनी वाढून 6.48 लाख कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था विस्तारत असल्याचे स्पष्ट होत आहे. 30 जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत भारताचा विकासदर 13.5 टक्के इतका होता. तो 15 टक्क्यांपेक्षा जास्त राहणे अपेक्षित असतानाही थोडा कमी भरला आहे.
मात्र अर्थव्यवस्था इतर क्षेत्रात वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्ष कर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 1 एप्रिल ते 8 सप्टेंबर दरम्यान करदात्यांना 1.19 लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. गेल्या वर्षातील या कालावधीतील परताव्याच्या तुलनेत हा परतावा 65 टक्क्यांनी जास्त आहे.
कर विभागाने म्हटले आहे की, कंपनी कर भरण्यात 26 टक्के तर वैयक्तिक प्राप्तिकर भरण्यात 44 टक्क्यांची वाढ झाली आहे. पूर्ण आर्थिक वर्षामध्ये केंद्र सरकारने प्रत्यक्ष करातून 14.20 लाख कोटी रुपयांची अपेक्षा केली आहे. एकूण परिस्थिती पाहता हे उद्दिष्ट साध्य करता येणे सहज शक्य आहे. यामध्ये 7.20 लाख कोटी कंपनी करातून येतील तर सात लाख कोटी वैयक्तिक प्राप्ति करातून येतील.
अर्थव्यवस्था विस्तारण्याबरोबरच केंद्र सरकारने व अर्थ मंत्रालयाने कर भरणा सोपा व्हावा याकरिता बरेच प्रयत्न केले आहेत.
कर संकलनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे कर संकलन वाढण्यास मदत होत असल्याचे गेल्याच आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते. आगामी काळातही करदात्यांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने कर भरता यावा याकरिता तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्ष कर संकलन वाढत असतानाच अप्रत्यक्ष कर संकलन म्हणजे जीएसटीचे संकलनही गेल्या काही महिन्यापासून वाढत आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलनाची आकडेवारी अपेक्षित की म्हणजे अर्थसंकल्पात ठरविल्या इतकी असेल असे समजले जाऊ लागले आहे.