पुणे – राज्यातील प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड) अभ्यासक्रमासाठी यंदा केवळ 14 हजार 388 विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला असून तब्बल 21 हजार 476 जागा रिक्त आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी “डी.एल.एड’च्या प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे.
राज्यात सध्या शासकीय महाविद्यालये 16, अनुदानित 97 तर विनाअनुदानित 542 याप्रमाणे एकूण 655 महाविद्यालये आहेत. 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी 35 हजार 864 जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. 2012 पासून शिक्षक भरतीला बंदी होती. त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून शासनाच्या पवित्र पोर्टलमार्फतच शिक्षक भरती सुरू करण्यात आली. या भरतीतही अनेक अडथळे येत आहेत.
डी.एल.एड.चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) व अभियोग्यता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या सर्वच परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकऱ्या मिळविण्यासाठी मोठी धडपड करूनही यश मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सतत सांगण्यात येते.
गेल्या काही वर्षात डी.एल.एड.च्या अभ्याक्रमाला प्रवेश घेण्याबाबतचा कल कमी झाला आहे.
यामुळे प्रत्येक वर्षी महाविद्यालये बंद करावी लागली. 2019-20 या शैक्षणिक वर्षात 21 हजार 161 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतच्या वर्षात विद्यार्थ्यांची संख्या 6 हजार 773 ने घटली. करोनामुळे विद्यार्थी संख्या घटली हे स्पष्टच होत आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही प्रवेशाच्या जागा शिल्लक राहिल्या आहेत.