अमोल मतकर
संगमनेर – कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, अनेक बेघर झालेत तर अजूनही काही लोक पुरात अडकलेले आहेत. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. असे असले तरी पूरग्रस्तांचे पाणी व अन्ना वाजून हाल होत आहे.अशावेळी येथील विश्वास हासे कुटुंब सांगलीतील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले असून या कुटुंबियांनी घरात जेवण व नाष्ट्याची पाकिटे तयार करून सांगलीत पूरग्रस्तांना त्याचे वाटप केले आहे.
नैसर्गिक संकटे आणि आपत्तीमध्ये मानवतेची ज्योत नेहमीची प्रज्वलित राहिल्याचे विश्वास हासे यांच्या रूपाने पाहायला मिळते. पंचगंगा नदीने कहर केला असून गावेच्या गावे उद्धवस्त झाले आहेत. या महापुरामुळे लाखो लोक विस्थापित झाले. घरातले होतं नव्हतं सगळं वाहून गेलं, जनावरेही गेलीत, खायला दाणा नाही की डोक्यावर छप्पर नाही, अनेकांचा आधार ही पुराने ओढून नेला. अशावेळी त्यांना आपल्या आधाराची गरज असते. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा… एवढेच पूरग्रस्तांचे अपेक्षा असते.
पुराने सगळेच नेल्यामुळे या पूरग्रस्तांकडे काही उरलेलं नाही. पोट भरेल एवढं अन्नही त्यांना मिळत नाही. त्यातच संगमनेर तालुक्यातील चिखली येथील राहणारे विश्वास हासे हे सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथे एका कॉलेजमध्ये काम करत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून इस्लामपूर एमआयडीसीमध्ये तात्पुरत्या राहणाऱ्या लोकांसाठी हासे यांची आई सुनंदा व पत्नी प्रियांका यांच्या मदतीने घरातच जेवनाचे व नाश्त्याची पाकीटे तयार करून ते पूरग्रस्तांना वाटप करून सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल संगमनेर मध्ये सर्वत्र कौतुकाची थाप मिळत आहे.
संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक व बंधूभगिनींना तसेच सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व सामाजिक संस्था यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, कराड सांगली कोल्हापूर या ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली असल्याने तेथील नागरिकांना औषध अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीची गरज असून संगमनेर व आसपासच्या गावातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त मदत करावी.
सागर हासे