घोड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मंचर/डिंभे – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागांत सुरू असलेल्या पावसाने पूर नियंत्रणासाठी डिंभे (हुतात्मा बाबू गेनू सागर) धरणाच्या तीन दरवाजातून 3 हजार क्युसेकने शुक्रवारी (दि. 2) दुपारी एक वाजता घोडनदीत पाणी सोडण्यात आले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा आणखी विसर्ग वाढविण्यात येईल, असे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आंबेगाव, जुन्नर, शिरुर आणि नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या डिभे धरणातून 3 हजार क्युसेकने घोडनदीपात्रात विसर्ग करण्यात आला. सध्या धरणात 88 टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी यावेळी 83.88 टक्के पाणीसाठा होता. पश्चिम आदिवासी भागात पडत असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरू असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आहुपे, तिरपाड, माळीण, बोरघर, असाणे, पाटण, तळेघर इत्यादी आदिवासी डोंगरी भागात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
15 ते 25 जुलैपर्यंत आदिवासी भागात पावसाच्या तुरळक सरी पडल्या होत्या. त्यावेळी डिभे धरणात 35 टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर 25 जुलैपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने शुक्रवारपर्यंत (दि. 2) 88 टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती धरणाचे उपअभियंता एस. टी. देवरे आणि शाखा अभियंता तान्हाजी चिखले यांनी दिली. धरणाच्या एकुण पाच दरवाजापैकी तीन दरवाजातून 3 हजार क्युसेकने घोडनदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, उजव्या कालव्याच्या दोन-तीन ठिकाणी किरकोळ माती भराव्याचे काम राहिल्याने पाणी सोडण्यात आले नाही.
कालव्याच्या किरकोळ दुरुस्तीचे काम दोन दिवसांत पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडले जाणार असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. पावसाचा जोर आदिवासी भागात अधिकच वाढल्यास धरणाच्या पाचही दरवाजातून पाणी घोडनदीपात्रात सोडले जाईल. पर्ज्यन्यमानानुसार विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.