– विनोद मोहिते
इस्लामपूर – गेली चार दशके सहकार आणि राजकीय क्षेत्रावर राज्य पातळीवर आपल्या व्यक्तीमत्वाची छाप टाकणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन दिलीप पाटील यांनी आज चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले.
” फिलिंग ढगात” या विनोदी ग्रामीण धाटणीच्या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. मंत्री जयंत पाटील यांनी दिलीप तात्यांच्या ” अनुराधा प्रॉडक्शन हाऊस” सह नव्या क्षेत्रातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिलीप पाटील हे राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष आहेत. तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाचे साक्षीदार आणि मार्गदर्शक आहेत.
शुक्रवारी रंगपंचमीच्या दिवशी अंगभूत कलाकार असणाऱ्या दिलीप पाटील यांनी वयाच्या पासष्टीनंतर नव्या क्षेत्रात पाऊल टाकले. कोण काय म्हणेल ? लोक काय बोलतील यापेक्षा ज्या वेळी “फिलींग ढगात” चित्रपट पॉप्युलर होईल तेव्हा अनुराधा प्रॉडक्शनची वाटचाल निश्चितच यशस्वी होईल असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी दिला.
ते म्हणाले,” चित्रपट निर्मिती करणे सोपे आहे मात्र प्रदर्शित करणे हे आव्हानात्मक काम आहे. आता घरबसल्या चित्रपट पाहायला मिळत आहेत. कोरोना नंतरच्या कालावधीत मनोरंजनासाठी सिनेमा मालिका बघण्याचे प्रमाण वाढले आहे. याक्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे.
सभ्यता आपल्यात आहे म्हणून याक्षेत्रात लांब राहिले पाहिजे असा मानणारा एक वर्ग आहे.अशा व्यक्तींनी या क्षेत्राकडे व्यावसायिक वृत्तीने पहायला हवे. हा चांगला मार्ग आहे म्हणून निवडायला हरकत नाही. निर्मात्यांची गुंतवणूक असते.प्रथम चित्रपटासाठी शासनाचे अनुदान असते. हॉटस्टार, नेटफिल्क्स सारख्या वेगळ्या माध्यमातून ही फिल्म वितरीत करता येईल.”
ते म्हणाले,” वेगवेगळे नवे प्रोजेक्ट नव्याने हाती घेऊ शकता.यातून उत्पन्नही मिळू शकते.या क्षेत्रात अनुराधा प्रॉडक्शन हे मोठे मोठं नाव होईल. दिलीप तात्यांची या क्षेत्राची सुरुवात योग्य क्षणी झाले आहे. हे क्षेत्र आता वाढायला लागले आहे. चांगला व्यवसाय होईल. या क्षेत्राची जाणीव असणारे तालुक्यात भरपूर आहेत त्यांच्या प्रतिभेचा वापर करून घ्यावा.”
यावेळी ” फिलिंग ढगात” या चित्रपटातील कलाकारांसह दिग्दर्शक कोंडीबा करांडे, माजी नगराध्यक्ष चिमन डांगे,आनंदराव पाटील, विजय पाटील, संजय पाटील, संग्राम पाटील, क्रांतीप्रसाद पाटील उपस्थित होते.
बालपणापासून फिल्मसृष्टीचे आकर्षक..!
दिलीप पाटील म्हणाले,” विद्यार्थिदशेत राजारामबापूंच्या मार्गदर्शनामुळे राजकारणात आलो. लहानपणापासून वाळव्याच्या नदी काठी वाळूत नाट्यछटा रंगायच्या.गावातील नाटकात बाल कलाकार म्हणून असायचो. हायस्कूल आणि कॉलेजच्या जीवनातही नाटकात काम करीत गेलो. उत्कृष्ट कलाकार म्हणून बक्षिसे मिळवली. गावातील शिवाजी थिएटरमध्ये खूप चित्रपट पाहिले. दिलीप कुमार हे माझ्या आयुष्याचे नायक झाले. “आंटीनं वाजवली घंटी” या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. यात मी गृहमंत्री होतो. तर कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळात असल्याने अनेक चित्रपट कलावंतांच्या संपर्कात आलो. आतां निर्मितीच्या क्षेत्रात उतरलो आहे. निश्चित यश मिळवणारचं.”
तर मुलांनी प्रॉडक्शन व्यवसायात उतरावे
दिलीप तात्या प्रतिभावंत निर्माता आहेत यात शंका नाही. पण मुलांनी या प्रॉडक्शन व्यवसायात उतरावे. तुमच्यात प्रतिभा नसली तरी चालेल पण हा व्यवसाय कळला तर उत्पन्नाच्या दृष्टीने तुम्ही दुप्पट-चौपट आर्थिक प्रगती साधाल. त्यामुळे आपण सर्वांनी याकडे हा व्यवसाय म्हणून पहायला हवे असा सल्ला मंत्री जयंत पाटील यांनी दिलीप पाटील यांच्या संग्राम आणि क्रांतीप्रसाद या मुलांना दिला.