युवा शक्ती प्रतिष्ठानचा 9 वा नोकरी मेळावा उत्साहात
नगर: युवा शक्ती प्रतिष्ठान गेल्या 8 वर्षांपासून उदात्त हेतूने नोकरी मेळावा उपक्रमाचे आयोजन करत आहे. आजच्या पिढीला त्वरित मोठ्यापदावर जायचे असते. मात्र मोठेपण व मोठेपद मिळविण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असते. देशातील अंबानी पासून नगरच्या व्हिडिओकॉनच्या धूत यांच्यापर्यंत प्रत्येकाने छोट्या नोकरीपासून सुरुवात करुन ध्येयाने प्रेरित होऊन कष्ट केले, म्हणून ते आज मोठे झाले आहेत. युवकांनी अशा यशस्वी उद्योजकांचे आत्मचरित्र वाचून आदर्श घ्यावा, असे आवाहन खासदार दिलीप गांधी यांनी केले.
युवा शक्ती प्रतिष्ठानच्यावतीने भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष खा.दिलीप गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 8 वर्षांपासून नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी झालेल्या 9 व्या नोकरी मेळाव्याचे उदघाटन येथील सारडा महाविद्यालयात उपमहापौर मालन ढोणे यांच्या हस्ते झाले. तसेच अहमदनगर जिल्हा चेस ऍमेच्युर असोसिएशनच्यावतीने दोन दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे उदघाटनही या कार्यक्रमात झाले. यावेळी एल ऍण्ड टी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आशिष देसाई, उद्योजक अनुराग धूत, हिंद सेवा मंडळाचे सुनिल रामदासी, भाजपा सरचिटणीस किशोर बोरा, नगरसेवक मनोज दुलम, भैय्या गंधे, रविंद्र बारस्कर, अजय चितळे, गणेश नन्नवरे, राहुल कांबळे, मनोज ताठे, उदय कराळे, संयोजक सुवेंद्र गांधी, सारडा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.डि.वाय.जाधव, बुद्धीबळ असोसिएशनचे सतीश शाह, सुनिल घोडेराव, राहुल जामगांवकर आदि उपस्थित होते.
यावेळी नगर, पुणा, सुपा, औरंगाबाद येथील 32 राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग या नोकरी मेळाव्यात होता. सकाळपासून सारडा महाविद्यालयात विविध कंपन्यांमध्ये मुलाखती देण्यास युवक, युवतींनी गर्दी केली होती.
उपमहापौर मालन ढोणे म्हणाल्या, नोकरी मेळाव्यानिमित्त तज्ञांकडून युवकांना चांगले मार्गदर्शन झाले आहे. सर्व युवकांनी या नोकरी मेळाव्याचा लाभ घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे, खा.दिलीप गांधी यांना उदंड आयुष्य लाभो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
संयोजक सुवेंद्र गांधी म्हणाले, गेल्या 8 वर्षांपासून नोकरी मेळाव्याला मिळत असलेला प्रतिसाद वाढतच आहे. म्हणून विविध राष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्यांना पाचारण करुन एकाच ठिकाणी नोकरी उपलब्ध करुन देऊन युवकांचा वेळ व पैसा वाचवत आहे. नगर व सुपा एमआयडीसी क्षेत्रात अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या सुरु होत आहेत. नोकरी मेळाव्याबरोबरच यावर्षी राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचेही आयोजन केले आहे. या स्पर्धेलाही सर्व गटातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले तर आभार डॉ.सुनिल गंधे यांनी मानले. नोकरी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी भरत दळवी, नितीन जोशी, लक्ष्मीकांत तिवारी, नितीन शेलार, रोशन गांधी, अज्जू शेख, सुमित देवतरसे, वैभव भोगाडे, मिलिंद भालसिंग, आशिष काळे, प्रशांत तापकिरे आदिंनी परिश्रम घेतले.