भोपाळ – मध्य प्रदेश मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आल्याच्या घटनेला आता नउ दिवस झाले आहेत. मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली आहे. मात्र अजुनही आपल्याकडे कोणत्या विभागाचा कारभार देण्यात आला याची त्यांना कल्पना नाही. याच मुदद्यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी शिवराज सिंह चौहान सरकारवर निशाणा साधला आहे.
सिंह यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की मंत्रिमंडळा विस्ताराचे आठ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र खातेवाटपाची जी कवायत सुरू आहे, ती अद्याप संपलेली नाही. टायगर आता दंतहीन आणि नखे नसलेला झाला आहे का? आता आपली हद्द सोडून कोण पलायन करते तेच बघायचे आहे. सिंह यांनी अगोदरच्या ट्वीटमध्ये म्हटले होते की राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अगोदर भोपाळ ते दिल्ली अशी संपूर्ण भारतीय जनता पार्टीत कवायत सुरू होती. आताही खातेवाटपाबाबत भांडणे सुरू आहेत. हा खातेवाटपाचा वाद नसून लूटीवरून सुरू असलेला वाद आहे. परिवहन, उत्पादन शुल्क, महसूल, नगरविकास ही खाती सोडण्याची शिंदे (ज्योतिरादित्य) यांची मुळीच तयारी नसणार. का, याचे उत्तरही लवकरच मिळेल.
दरम्यान, दिग्विजय यांच्या या ट्वीटवरून त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. ते राजकारणाच्या या खेळातील जुने खेळाडू असल्यामुळे त्यांना याची चांगलीच कल्पना असणार असे एकाने म्हटले आहे. तर मध्य प्रदेशातील खातेवाटपाच्या कवायतीवरून बोलताना सिंह यांनी महाराष्ट्रातील खातेवाटपाची कवायत किती दिवस आणि का चालली याचीही माहिती द्यावी अशी मागणी एका युजरने केली आहे. या लूटीमुळे कॉंग्रेसची वाताहत झाली. सत्य अखेर ओठांवर येतेच. त्यांच्या मुलाला त्यांनी हे मंत्रिपद दिले, त्याची माहितीही त्यांनी द्यावी. त्यांना किती लूट मिळाली त्याचा हिशेब द्यावा अशी टीप्पणी आणखी एका युजरने केली आहे.