वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामस्थांचा निर्णय
चऱ्होली – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिघीकरांनी एकत्र येत तीन दिवसांचा कडकडीत बंद पुकारला आहे. मंगळवारपासून (दि. 7) गुरुवारपर्यंत (दि. 9) हा बंद असणार आहे. या बंदमध्ये फक्त मेडिकल व दवाखाने सोडून इतर भाजी व किराणामालासह सर्वच दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. दिघी ग्रामस्थांमध्ये जनजागृतीसाठी ध्वनिक्षेपकाद्वारे संदेशही देण्यात येत आहे.
दिघीतील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सध्या 45 आहे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दिघी ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी (दि. 4) सोशल मीडियाद्वारे संपर्क साधत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये ग्रामस्थांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिघीगावामध्ये स्वतंत्र भाजी मंडई नाही. त्याचप्रमाणे महापालिकेच्या वतीने करोनापासून बचावासाठी तात्पुरत्या स्वरुपात भाजीमंडई सुरू करण्यासाठी पुरेशी मोठी जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे भाजी, फळे विक्रेत्यांना रस्त्याच्याकडेलाच विक्रीसाठी बसावे लागत आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात अनेकांची नोकरी गेल्याने उदरनिर्वाहासाठी त्यांनी फळे, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे दिघी परिसरात अगोदरपेक्षा अधिक भाजी-फळे विक्रेत्यांची संख्या आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस भाजी-फळे घेण्यासाठी रस्त्यावर नागरिकांची प्रचंड गर्दी असते. त्याचप्रमाणे नागरिकांकडून सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीचे पालनही करण्यात येत नाही.
तसेच, किराणामालासह इतर वस्तू विक्री दुकानांमध्येही नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी करतात. त्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहक आणि नागरिकांना करोना संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने याविषयी सलग तीन दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही मे महिन्यामध्ये केलेला लॉकडाऊन दिघी ग्रामस्थांच्या वतीने शंभर टक्के बंद पाळून यशस्वी केला होता.