चंदीगड – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 18 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता पंजाब पोलीस दलातील डीआयजी (जेल) लखमिंदर सिंह जाखड यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला.
कडाक्याच्या थंडीत उघड्यावर शेतकरी आंदोलन करत आहेत. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मला चांगल्याच ठाऊक आहेत. यामुळे मला या आंदोलनाचा भाग व्हायचे असल्याचे, त्यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिले आहे.
त्याचबरोबर मला दिल्लीत जाऊन शेतकरी बांधवांसोबत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा द्यायचा आहे. त्यासाठी मला माझ्या जबाबदारीतून मुक्त करा, असे लखमिंदर यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिले आहे.
एडीआयजी (जेल) पीके सिन्हा यांनी राजीनाम्याची प्रत मिळाल्याबाबत सांगितले आहे.