पटना – दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारू दारू पिल्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांत विविध ठिकाणी 41 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. काही बाधितांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु असून काहींना अंधत्व आले आहे.
गोपालगंज आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यात मागील दोन दिवसांत विषारी दारूमुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. चंपारणचे डीआयजी यांनी प्राथमिक अहवालात नौतन स्टेशन भागात विषारी दारू पिल्याने किमान 13 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे.
– गोपालगंजमध्ये दारू पिल्याने 4 जणांचा मृत्यू 3 आजारी
गोपालगंज जिल्ह्यातील मोहम्मदपूर ठाण्याच्या हद्दीत कुशहर गांवात विषारी दारू पिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण आजारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शवविच्छेदनासाठी मृतदेह गोपालगंज सदर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. संतोष गुप्ता (30), छोटे लाल सोनी (50) धर्मेंद्र राम (20) रामेश्वर राम (45) यांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू झाला आहे.
गोपालगंजचे पोलिस अधीक्षक आनंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावात काही जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर निश्चीत कारण स्पष्ट होईल. पोलिसांचे पथक मृतदेह घेऊन रुग्णालयाकडे निघाले आहे. तिकडे आजारी लोकांवर पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
15 दिवसांत 41 जणांचा मृत्यू –
– मुजफ्फरपूर मध्ये 28 ऑक्टोबर 2021ला सरैया पोलिस ठाणे हद्दीत रूपौली येथे विषारी दारूमुळे 6 जणांचा मृत्यू झाला.
– बेतिया मध्ये 3 नोव्हेंबर पासून आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. काही लोक अजूनही गंभीर आजारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
– गोपालगंज येथे 2 नोव्हेंबर पासून आतापर्यंत विषारी दारूमुळे मोहम्मदपूर येथे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. येथेही मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.
– सिवान येथील गुठनी मध्ये 24 ऑक्टोबरला 5 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आकडेवारीनुसार बिहारमध्ये यावर्षी विषारी दारूमुळे 70 जणांचा मृत्यू झाला आहे.