नागरिक, दुकानदार वैतागले : तांत्रिक समस्यांसोबत धान्य वाटपासही उशीर
पिंपरी – स्वस्त भाव धान्य दुकांनामध्ये सध्या मशीनचे सर्व्हर डाऊन होणे, नेटवर्क स्लो होणे, अचानक मशीन बंद पडणे अशा अडचणी येत आहेत. त्याशिवाय, धान्य दुकानांमध्ये दरमहा येणारे धान्य बऱ्याचदा महिना अखेरीस येत आहे. पर्यायाने त्याचे वाटप त्याच महिन्यात पूर्ण होत नसल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांबरोबरच धान्य दुकानदार देखील वैतागले आहेत.
धान्य दरमहा 15 तारखेच्या आतमध्ये येणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या हे धान्य विलंबाने येत आहे. रास्त भाव धान्य दुकानदारांना महिना अखेरीस हे धान्य प्राप्त होत आहे. त्यामुळे धान्याचे वाटप महिना अखेरपर्यंत पूर्ण होत नाही. पर्यायाने, चालू महिन्यात प्राप्त झालेल्या धान्याचे वाटप पुढील महिन्यात करावे लागत आहे.
राज्यात ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले जाते. या मशीनमध्ये 2 जी नेटवर्क सुविधा आहे. त्यामुळे नेटवर्क खूप हळू चालते. वारंवार सर्व्हर डाऊन होतो. अचानक मशीन बंद पडते. पर्यायाने, स्वस्त धान्य दुकानदार आणि नागरिकांमध्ये वाद होतात. केशरी कार्डधारकांना देण्यात येणारे धान्य गेल्या दोन महिन्यांपासून आलेले नाही. त्यामुळे नागरिकांकडून वारंवार विचारणा केली जात आहे.
‘फोर जी’च्या काळात ‘टू जी’ प्रणाली
राज्यात ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरणामध्ये येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या नॅशनल इर्न्फोमेटिक सेंटरकडे (एनआयसी) ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनने तक्रार केली आहे. ई-पॉस मशीनमध्ये 2 जी प्रणाली असल्याने नेटवर्क संथ गतीने सुरू असते.
बऱ्याचदा अचानक मशीन बंद पडते. सर्व्हर डाऊन होतो. त्यामुळे नागरिक आणि दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. मशीनला 4 जी नेटवर्क देऊन हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावा. दुकानदारांना मशीन देऊन पाच-सहा वर्षांचा कालावधी उलटला आहे. दुकानदारांना करोनाची लागण होऊ नये, यासाठी यूबीएस कॉर्ड एक्सटेन्शनची सुविधा द्यायला हवी. त्यामुळे दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये अंतर राहील, अशी मागणी बाबर यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे एक पत्र केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांना देखील पाठविले आहे.
अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेचे धान्य रास्त भाव धान्य दुकानांतून दरमहा वितरित केले जाते. हे धान्य सध्या महिना अखेरीस दुकानदारांना मिळत आहे. त्यामुळे धान्याचे वाटप ज्या-त्या महिन्यात पूर्ण होत नाही. तरी, दोन महिन्यांचे धान्य एकत्रित देण्यात यावे. त्यामुळे नागरिकांची सोय होऊ शकेल.
– गजानन बाबर, अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन.