सातारा – आर्थिक वर्ष संपायला केवळ 12 दिवस उरले असताना, सातारा पालिकेला मालमत्ता करवसुलीचा निम्मा पल्लादेखील गाठता आलेला नाही. मालमत्ता कर व पाणीपट्टी मिळून 44 कोटी 86 लाख रुपये वसूल करायचे आहेत. त्यापैकी केवळ 12 कोटी आठ लाख 64 हजार रुपयांची वसुली झाली असून, उर्वरित 33 कोटींच्या थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट प्रशासन इतक्या कमी वेळेत कसे गाठणार, हा प्रश्न आहे.
पालिकेच्या हद्दीत 36 हजार मिळकती आधी होत्या. हद्दवाढीमुळे 25 हजार मिळकतींची भर पडली आहे. वाढीव भागातील मिळकतींना पालिकेचा कर लागू झालेला नाही. सद्य स्थितीत निवासी मिळकतींची तीन रुपये व व्यावसायिक मिळकतींची सहा रुपये स्क्वेअर फूटप्रमाणे कर आकारणी केली जाते. पालिकेने करवसुलीसाठी पथके नेमली आहेत.
जप्ती पथकांकडूनही मोहीम राबविली जात आहे. जप्तीच्या नोटिसा मिळाल्यावर काही थकबाकीदारांनी स्वत:हून कर भरला असला, तरी अनेक नागरिकांनी अद्यापही कर भरला नसल्याचे वसुलीच्या आकड्यांवरून दिसते. आर्थिक वर्ष संपायला केवळ 12 दिवस उरले असताना, 32 कोटी 93 लाख 28 हजार 831 रुपये करवसुली कशी होणार? पालिकेच्या तिजोरीत रोज दोन ते चार लाखांची भर पडत आहे. ही गती पाहता वर्षाअखेरीस करवसुलीचे उद्दिष्ट गाठणे अशक्यप्राय दिसत आहे.