मुंबई – राज्यातील सत्ताधारी आघाडीत कुरबुरी सुरू असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. त्यात तथ्य किती हा नंतरचा भाग मात्र चर्चा सूरू झाल्या आहेत. त्यातही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने स्वबळाचा नारा देत आहेत.
अगोदर शिवसेनेचे संजय राऊत यांच्याशी त्यांची जाहीर कुरबुर झाली आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पटोलेंच्या दाव्यांना फार महत्व दिले जाउ नये असे वेगळ्या शब्दांत सूचवले आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस खरेच अस्वस्थ आहे का या विषयाला तोंड फुटले असताना कॉंग्रेसचे प्रदेश प्रभारी एच के पाटील तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात पाटील महाराष्ट्र कॉंग्रेस आणि मुंबई कॉंग्रेसचा आढावा घेणार आहेत. एकीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादी वर्धापन दिनानिमित्त महाविकास आघाडी सरकार लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवणार असे स्पष्ट केले होते. त्यानंतर नाना पटोले यांनी विदर्भात दौऱ्यावर कॉंग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे विधान केले. त्यामुळे चर्चाना सुरुवात झाली.
महाविकास आघाडी निवडणुका एकत्र लढवणार की स्वबळावर याबाबत पक्षश्रेष्ठी शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच हायकमांडने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यास स्वीकारेन असे विधान करून पटोलंनी त्या पदावरही दावा केला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी एच के पाटील राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नाना पटोले यांनी दिलेला स्वबळाचा नारा कॉंग्रेस प्रभारी यांना मान्य आहे का? कॉंग्रेसने पुढील विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याची मानसिकता केली आहे का? असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत व सगळ्यांत महत्वाचे दोन चव्हाण आणि अन्य ज्येष्ठ नेते डावलून पटोले मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कॉंग्रेस खरेच पुढे करणार आहे का, असे अनेक प्रश्न आहेत.
पाटील तीन दिवसातील दौऱ्यात राज्यातील कॉंग्रेस मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. कॉंग्रेसच्या मंत्र्यांची कामगिरी, किमान समान कार्यक्रमातील कॉंग्रेसच्या पूर्ण झालेल्या मागण्या याबाबत चर्चा होऊ शकते. पदोन्नतीतील आरक्षण विषयावरून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नाराजी दर्शवली होती. त्याचाही अभ्यास केला जाण्याची शक्यता आहे.