न्यूयॉर्क – कोणत्याही पदार्थाला चव आणण्याचे काम मीठ करत असले तरी आहारातील हे मीठ अत्यंत धोकादायक असल्याचा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालात काढण्यात आला आहे. आहारातील मिठामुळे विविध प्रकारचे विकार आणि रोग जडू शकतात असे या अहवालात म्हटले आहे. 2030 या वर्षापर्यंत सर्वसामान्यांच्या आहारातील मिठाचे प्रमाण 30% पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट जागतिक आरोग्य संघटनेने ठेवल्याची माहितीही या अहवालात देण्यात आली आहे.
येत्या काही वर्षांमध्ये आहारातील मिठामुळे झालेल्या विकारांमुळे आणि रोगामुळे 70 लाख पेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागू शकतो असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनातर्फे 14 मार्च ते 20 मार्च या कालावधीमध्ये सॉल्ट अवेअरनेस विक म्हणजेच मिठविषयक जनजागृती सप्ताह पाळला जातो त्यानिमित्ताने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे जगभरातील सामान्य नागरिक आज दररोज किमान 11 ग्रॅम मीठ खात आहेत जे त्यांच्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे. मानवी शरीराला दररोज एवढ्या मिठाची आवश्यकता नाही असे या अहवालात म्हटले आहे. दररोज फक्त पाच ग्रॅम म्हणजे एक चमचा मीठच आहारात असावे असेही या अहवालात सुचवण्यात आले आहे. मिठामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते पण मानवी शरीराला जेवढ्या प्रमाणात सोडियमची गरज असते,
त्याच्यापेक्षा जास्त सोडियम शरीरात गेले तर ते घातक ठरू शकते म्हणूनच मिठाचा वापर करताना काळजी घ्यायला हवी असे या अहवालात म्हटले आहे गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातील सर्वच देशांमध्ये पॅकबंद फूड घरी आणून खाण्याचे प्रमाण वाढले आहे. आणि या पॅकबंद फुडला टिकवण्यासाठी त्यामध्ये मिठाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो साहजिकच येत्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये जगभरात सर्वत्र मिठाचा वापर कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आता पॅक बंद फुडची निर्मिती करणाऱ्या संस्थांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.