नवी दिल्ली – देशभरामध्ये सध्या कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी लॉक डाऊनचा दुसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. लॉक डाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भारताला इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी ठेवण्यामध्ये यश आलं आहे. मात्र भारतामध्ये कोरोना प्रसाराच्या वेगापेक्षा अफवांच्या प्रसाराचा वेग अधिक असल्याचं पाहायला मिळत असून ही देखील एक चिंतेचीच बाब म्हणावी लागेल. अशाच एका अफवेने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फेर धरला असून याबाबत आज खुद्द केंद्र सरकारच्या अर्थखात्याला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोना संकटामुळे केंद्र सरकार निवृत्ती वेतन अर्थात पेन्शमध्ये २० टक्के कपात करणार असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर पसरवली जात होती. मात्र आज केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयातर्फे अशा प्रकारचा कोणताही निर्णय सरकारच्या विचाराधीन नसून २० टक्के कपातीबाबतचा संदेश पूर्णपणे चुकीचा असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.
याबाबत अर्थमंत्रालयातर्फे एक ट्विट करण्यात आलं असून यामध्ये, “पेन्शनमध्ये कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही. सरकारी रोखे व्यवस्थापनाकडून कोणत्या प्रकारच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये फरक पडणार नाही.” अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, अर्थमंत्रालयातर्फे पेन्शन बाबत स्पष्टीकरण देण्यात आल्याने निवृत्ती वेतन धारकांची चिंता नक्कीच कमी झाली आहे. आपल्या संपर्कामध्ये देखील पेन्शन धारक असतील तर हे वृत्त आपण त्यांच्यासोबत शेअर करून त्यांची चिंता देखील दूर करू शकता.