– देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला सवाल
– नागपूर अधिवेशन दोन आठवडे घेण्याची मागणी
मुंबई : नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला लोकसभेत पाठिंबा देणाछया शिवसेनेने आता आपल्या भूमिकेवरून घुमजाव केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. राज्यातील सरकार टिकवण्यासाठी कॉंग्रेसच्या दबावामुळे नागरिकत्व विधेयकाबाबत शिवसेनेने आपली भूमिका बदलली काय, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. मात्र, शिवसेना इतक्या वर्षांपासूनची भूमिका बदलणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नागरिकत्व विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याने कॉंग्रेसमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. यापाश्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना विधेयकाबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली. विधेयकाबाबत जोपर्यंत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत आपला पक्ष राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा देणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. नागरिकत्व विधेयकाबाबत शिवसेनेची भूमिका संदिग्ध असून महाराष्ट्रातील सरकार वाचविण्यासाठी कॉंग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने ही भूमिका स्वीकारली आहे काय हा प्रश्न आहे. पण शिवसेना इतक्या वर्षांपासूनची भूमिका बदलणार नाही हा विश्वास मला आहे, असे फडणवीस म्हणाले.
नागपूरचे हिवाळी अधिवेशन सहा दिवसांचे होणार आहे. किमान दोन आठवडे तरी घ्या अशी आमची मागणी होती. परंतु, त्यांनी ती मान्य केली नाही, असे सांगतानाच एक आठवड्याचे अधिवेशन म्हणजे केवळ औपचारिकता ठरणार असल्याचे फडणवीस म्हणाले. राज्यात सरकार स्थापन होऊनही ना खातेवाटप झाले ना मंत्रिमंडळ विस्तार. सरकार स्थापन झाल्यानंतर फक्त प्रकल्पांना स्थगिती दिल्याच्या बातम्या येत आहेत, असा टोला लगावतानाच लवकर खातेवाटप करून लोकांचे प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने यापूवर्वी शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी केली होती. ती आता ते सरकारमध्ये आल्यानंतर तातडीने पूर्ण झाली पाहिजे. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.