मुंबई: काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे गड किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर मात्र विरोधकांनी राज्य सरकावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. परंतु या निर्णयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीच पाठिंबा दर्शविला आहे.
यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. “राज्यातील गड-किल्ले हा महाराष्ट्राचा अभिमान आणि संस्कृती आहे. परंतु हे गड-किल्ले भाड्याने देण्याच्या घाट भाजपा सरकारने घातलाय. या निर्णयावर संबंध महाराष्ट्रातून विरोधाचा सूर उमटला असतानाच छत्रपतींचे वंशज आणि आता भाजपावासी झालेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी या निर्णयामध्ये गैर काय, उलट त्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदाच होईल, अशी मुक्ताफळे उधळली” असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
आपल्याकडे मंदिरांमध्ये लग्न करण्याची परंपरा आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले पर्यटन आणि इतर कार्यक्रमांसाठी देण्यास काही हरकत नाही, त्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदाच होईल, असा दावा उदयनराजेंनी केलाय. उदयनराजे आता भाजपाची भाषा बोलू लागले खरे. पण गड-किल्ले भाड्याने देण्यात गैर काय? हे विचारताना उदयनराजे यांचे रक्त उसळले नाही का? असा प्रश्न देखील राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.