मुंबई : मुंबईसह राज्याच्या विविध भागातून मजूर मोठ्या प्रमाणात आपापल्या राज्यात परतले. याचा उद्योग, व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तरुणांकडे ते कौशल्य नसल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी समाचार घेतला आहे.
याला उत्तर देताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, महाराष्ट्रातील युवकांकडे आवश्यक ती सर्व कौशल्य आहेत. फडणवीस यांनी इथल्या युवकांना कमी लेखू नये.
पुढे ते म्हणाले की , देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील तरुणांकडं परप्रांतिय मजुरांप्रमाणे कौशल्यं नाही म्हणतात. मात्र, यातून महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखणाऱ्या फडणवीसांचा पंतप्रधान मोदींच्या स्किल इंडियावरच विश्वास नसल्याचं दिसत आहे. स्किल इंडिया नावाचा कार्यक्रम नरेंद्र मोदी यांनी सुरू केला. तो फेल गेला की काय, असा प्रश्न निर्माण करणारं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांचं आहे, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला.