नवी दिल्ली : दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेसमध्ये पाच बॉम्ब ठेवले आहेत, असे ट्विट एका प्रवाशाने केल्याने ही एक्सप्रेस नवी दिल्लीजवळ दादरी रेल्वे स्थानकात अडवण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाने बॉम्बची अफवा असल्याने रेल्वे थंबवून तिची तपासणी करण्यात आली मात्र त्यात काही सापडले नाही., असे रेल्वे सुरक्षा दलाने स्पष्ट केले.
ग्वाल्हेरचा रहिवासी असणाऱ्या संजीव गुर्जर याने राजधानी (124240) मध्ये पाच बॉम्ब आहेत, असे मी तुम्हाला कळवू इच्छितो. ही राजधानी नवी दिल्लीतून कानपूरला जात आहे, असे ट्विट केले. त्यानंतर ही गाडी रोखण्यात आली. तिची तपासणी करण्यात आली.
या ट्विटला रिट्विट करत रेल्वेने याबाबत तातडीनडे कारवाई करावी, असे आदेश दिले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने तात्काळ पावले उचलत ही रेल्वे दादरी स्थानकावर थांबवली. आपल्या ट्विटमुळे उडालेली तारांबळ पाहून गुर्जरने पुन्हा ट्विट केले. हे ट्विट माझ्याकडून मानसिक तणावाच्या अवस्थेत केले आहे. माझ्या भावाची रेल्वे चार तास लेट झाली. त्यामुळे मला खूप राग आला आणि त्यामुळे मी हे ट्विट केल. यासाठी मी भारत सरकारची माफी मागत आहे.
मात्र या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.