नाशिक – एकीकडे नेतेमंडळींमध्ये राजकीय वाद आणि आरोप-प्रत्यारोप होत असले तरी हे नेते वैयक्तिक आयुष्यात चांगले संबंध जोपासून असतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित राहिले होते.
यावेळी भुजबळ, पाटील आणि राऊत एकाच सोफ्यावर बसलेले पाहायला मिळाले. एका बाजूला पाटील, दुसऱ्या बाजूला राऊत आणि मधे भुजबळ बसले होते. यावेळी या तिन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्या आहेत. गप्पा सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरही लग्न सोहळ्यात दाखल झाले. त्यावेळी राऊत यांनी उभे राहत फडणवीसांशी हस्तांदोलन केलं आणि औपचारिक गप्पाही मारल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि मोदींवर जोरदार टोलेबाजी केली. तर चंद्रकात पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला असल्याचे म्हंटले. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केली. त्यावरुनही संजय राऊत यांनी आज चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली.
माझा शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. मात्र, राजकारणात एकमेकांवर कितीही आरोप केले, टीका केली तरीही हे नेतेमंडळी वैयक्तीक आयुष्यात एकमेकांसोबत चांगले संबंध जोपासून असतात हे आज पुन्हा स्पष्ट झाले आहे.