राहुरी -एकीकडे करोनाची लढाई प्रशासन लढते आहे, मात्र क्वॉरंटाईन केलेल्या दोन कुटुंबातील तब्बल 14 सदस्यांनी धूम ठोकल्याची घटना राहुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. यात बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाचा समावेश आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
राहुरी तालुक्यात दोन ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. दोन्ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. तालुक्यातील केंदळ खुर्द येथे क्वॉरंटाईन केलेले एक जोडपे दुसऱ्याची मोटारसायकल घेऊन आपल्या दोन लहान मुला-मुलींसह पळून गेले आहेत. तर दुसऱ्या एका घटनेत संत गाडगेबाबा आश्रम शाळेतून आजपर्यंत क्कारंटाईन केलेल्या एका कुटुंबाने धूम ठोकली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 15 मे रोजी केंदळ खुर्द येथील सेंट जोसेफ विद्यालय येथील शाळेत काही जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यात एका आदिवासी जोडप्याचा समावेश होता. ते जोडपे दोन मुला-मुलींना घेवुन अचानक गायब झाले. मित्रांची मोटारसायकल घेऊन ते पळून गेले असल्याचे तेथे ड्युटीवर असलेल्या शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी ही घटना गाव समितीला तात्काळ सांगितली. बीड जिल्ह्यातून आलेले एक कुटुंब राहुरीतील संत गाडगे महाराज आश्रम शाळेत 17 मे रोजी क्वारंटाईन करण्यात आले होते. या कुटुंबात आठ ते दहा सदस्य होते. ते कुटुंब मंगळवारी रात्री कोणाची पूर्वपरवानगी न घेता निघून गेले. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यात 14 महिन्याची दोन लहान मुले देखील होती. त्या दोन कुटूंबाच्या शोध सुरु आहे. बाहेरगावहून कोणी आल्यास त्याचे प्रशासनाकडून तसेच गाव पातळीवर योग्य ती दखल घेतली जाते आहे.
त्यांना क्वॉरंटाईन केले जाते. त्यांची संस्थात्मक क्वॉरंटाईनची सर्व व्यवस्था केली जात आहे. असे असतानादेखील हे जोडपे पळून का गेले असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. हे जोडपे कुठे गेले याबाबत शोधाशोध करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र बुधवारी सकाळपर्यंत ह्या जोडप्यांचा थांगपत्ता लागला नाही, असे सांगण्यात आले. तहसीलदार फसुऊद्दीन शेख यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर पोलिसांनी या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.