मुंबई -चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सामन्याच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू करावेत, असे मतही त्याने व्यक्त केले आहे.
साडेसात वाजता सामना सुरू झाला तर सुरुवातीची काही षटके फलंदाजांना फायद्याची ठरतात. त्यावेळी मैदानात फारसे दव पडलेले नसते. मात्र, दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघाला मैदानावर पडत असलेल्या दवामुळे त्रास होतो. गोलंदाजांना चेंडू ग्रीप करता येत नाही. केवळ गोलंदाजांनाच नव्हे तर फलंदाजांनाही काही अडचणी येतात.
मैदानावर दव पडलेले असल्याने त्यांनी फटकावलेले चेंडू आऊट फिल्ड स्लो झाल्याने चौकार ठरत नाहीत. या वेळेत सामना सुरू झाला तर त्याचा लाभ गोलंदाजांना होतो. खरेतर आठ वाजता सामने सुरू झाले तर दोन्ही संघांना समान वातावरण मिळेल, असेही धोनीने सुचवले आहे.
आयपीएलचे सामने सुरुवातीच्या काळात रात्री 8 वाजता सुरू होत होते. गेल्या वर्षी करोनाच्या धोक्यामुळे भारतात होणारी ही स्पर्धा अमिरातीत भरवण्यात आली होती.
अमिराती व भारतीय वेळेत फरक असल्याने सामने सायंकाळी साडेसात वाजता सुरू होत होते. त्यामुळे यावर्षी देखील सामने साडेसात वाजता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून सामने योग्य वेळी संपू शकतील.