नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून माझी जी ओळख निर्माण झाली आहे त्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळेच माझ्या गळ्यात नेतृत्वाची माळ पडली, अशा शब्दात विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
एक कर्णधार व खेळाडू म्हणून धोनी खूप मोठ्या उंचीवर आहे. मी जेव्हा संघात पदार्पण केले तेव्हा मला त्याच्या या शांत स्वभावाचे खूप नवल वाटायचे. हा माणूस मैदानावर इतका शांत कसा राहू शकतो असा प्रश्न पडायचा. त्याच्याशी चर्चा करताना मात्र त्याच्या डोक्यात कायमच प्रतिस्पर्धी संघावर दडपण कसे वाढवता येईल याचाच विचार असायचा हे जाणवायचे. मग मी त्याच्या नेतृत्वाचा अभ्यास केला व त्याच्या योजना कीती भक्कम असतात याचीही प्रचिती आली, असेही कोहली म्हणाला.
संघात तसा नवखा होतो तरीही मी जे काही सुचवायचो ते धोनी शांतपणे ऐकून घ्यायचा व त्याला जर ते पटले तर तो त्याची अंमलबजावणी तर करायचाच पण माझे कौतुकही करायचा. कुठेही घमंड किंवा लहरी स्वभाव त्याने संपूर्ण कारकिर्दीत दाखवला नाही. तो त्याचा खेळ जितक्या गंभीरतेने करत असे तशीच अपेक्षा तो सर्व खेळाडूंकडूनही करायचा. एखाद्याला त्याचा सल्ला अंमलात आणता आला नाही तर नाराजही होत असे. मात्र, कधीही मैदानावर त्याने नाराजी दाखवली नाही तर तो सर्व गोष्टी ड्रेसिंग रूममध्ये त्या खेळाडूला सांगायचा. त्याचा हाच गुण पाहून मी त्याचा फॅन झालो, असेही कोहलीने सांगितले.
धोनीचे सल्ले, त्याचे नेतृत्व करण्याची पद्धत, सहकारी खेळाडूंना पाठिंबा देणे तसेच त्यांना समजून घेणे याबाबतीत धोनीचा हात कोणीही धरू शकणार नाही. मी त्याला सतत प्रश्न विचारून भंडावून सोडत होतो, पण तो कधीच चिडला नाही उलट माझ्या सर्व शंका दूर करण्याचाच त्याचा प्रयत्न राहिला. बहुदा माझ्या जिज्ञासू वृत्तीवरच त्याला विश्वास बसला असावा म्हणूनच त्याने स्वतः माझ्याकडे भविष्यातील भारतीय संघाचे नेतृत्व यावे असे त्याने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले असावे. जेव्हा त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा संघात वरिष्ठ खेळाडू असूनही माझ्याकडे कर्णधारपद दिले गेले. मी कर्णधार बनलो ते केवळ धोनीमुळेच असे मी आजही म्हणतो, असेही कोहलीने स्पष्ट केले.