माधव विद्वांस
महाराष्ट्रात पहिले भारतरत्न मिळविणारे शतायुषी, महर्षी कर्वे यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील खेड जवळील शेरवली येथे त्यांचे आजोळी झाला. दापोलीजवळील मुरूड हे त्यांचे गाव. ते “अण्णा’ या उपाधीने ओळखले जायचे. अण्णांचे शिक्षण खूप खडतर परिस्थितीत झाले, त्यासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व गणित विषय घेऊन पदवी संपादन केली.
अण्णासाहेबांनी फर्गसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे 1914 पर्यंत 23 वर्षे त्यांनी ही नोकरी केली. स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. पहिली पत्नी वारल्यानंतर (1891) त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी पंडिता रमाबाईंच्या “शारदा सदन’ या संस्थेतील एका विधवा आनंदीबाई तथा बाया यांचेबरोबर पुनर्विवाह केला. या पुनर्विवाहानंतर अण्णा पत्नीसह मुरूडला गेल्यानंतर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. तरीही न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचे व पुनर्विवाहाला मदत करण्याचे कार्य सुरूच ठेवले. 1893 साली त्यांनी “विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळ’ काढले. विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी 1899 साली “अनाथबालिकाश्रम’ या संस्थेची स्थापना केली.
1907 साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली व स्त्रीशिक्षणाचे रोपटे लावले. 1896 मध्ये अण्णासाहेबांनी हिंगणे येथे विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला त्यानंतर याच ठिकाणी 1907 साली महिला विद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर अण्णासाहेबांची “निष्काम कर्म मठा’ची स्थापना 1910 साली केली. पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून “हिंगणे स्त्री शिक्षण संस्था’ आणि त्यानंतर “महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ असे त्याचे नामकरण करण्यात आले. वर्ष 1916 मध्ये त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी 15 लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे “श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ (एसएनडीटी) असे नामकरण करण्यात आले.
त्यांच्या या कार्यामुळे अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. पदवीने सन्मानित केले. “पद्मविभूषण’ हा किताब त्यांना 1955 साली प्रदान करण्यात आला, तर लगेच 1958 साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान “भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आले. एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य हा पण त्यांचा एक सन्मानच होता. पुणे येथे 9 नोव्हेंबर 1962 रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.