चाफळ – चाफळ विभागातील धायटी गाव अतिवृष्टी बाधित पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी शासकीय मदतीच्या प्रतिक्षेत आहे. यंदा पावसाळ्यात चाफळ विभागात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असतानाच सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये बराचकाळ पाणी साठून राहिल्याने पिके कमजोर होऊन उत्पन्न निम्मे घटते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली.
दरम्यान ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होऊन धायटी गावातील पंचवीस एकर क्षेत्रातील सोयाबीन, भुईमूग, हायब्रिड आदी पिके पूर्णपणे कुजल्याने गावकऱ्यांना खूप मोठ्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
तरी प्रशासनाने त्वरित या बाधित क्षेत्राचे पंचनामे करून नुकसान भरपाईची तरतूद करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत चंद्रकांत देशमुख यांनी पंचवीस एकर बाधीत क्षेत्राचे महसूल विभागाने त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन आधार द्यावा अशी मागणी केली आहे.