नांदूर- दौंड तालुक्यातील दहिटणे व खामगाव या दोन गावांना जोडणाऱ्या मुळा मुठा नदीवरिल पुलाचे बांधकाम करण्यासाठी सुमारे 11 कोटी रुपये निधी 2018-2019 च्या राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला होता.
दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील दहिटणे व खामगाव या दोन गावांना जोडणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम स्व. आमदार सुभाष कुल यांच्या कार्यकाळात झाले होते. या बंधाऱ्यावरून शेतकऱ्यांच्या शेतमालाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक देखील होत होती; परंतु सद्यःस्थितीला हा बंधारा जीर्ण झालेला असून याचे कठडे देखील तुटलेले आहेत, तसेच शेतमालाची वाहतूक करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत होते. या सर्व बाबींचा विचार करून येथे मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी आमदार राहुल कुल यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरवा केला होता.
या पुलामुळे भविष्यात देवकरवाडी, मगरवाडी, गणेशनगर, दहिटणे, मेमाणवाडी, मिरवडी आदी गावांतील शेतकऱ्यांना आपला शेतमाल जवळच असलेल्या उरुळीकांचन बाजारपेठेत नेणे सोपे होणार आहे. पुलाच्या कामामुळे दळणवळण सोयीस्कर होणार आहेत.
- या पुलाच्या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला होता. आता या पुलाचे काम प्रगतीपथावर असून, या पुलामुळे देवकरवाडी, मगरवाडी, गणेशनगर, दहिटणे, मेमाणवाडी, मिरवडी भागांतील नागरिकांची सोय होणार आहे.
– राहुल कुल, आमदार, दौंड