Dharwad Accident – कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातामुळे अवघा देश हळहळला. आपापल्या आयुष्यामध्ये स्थिरसावर झालेल्या या जुन्या शाळकरी मैत्रीणींची बऱ्याच वर्षांनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट घडून आली होती. पुढे या सर्वांनी ‘गेट-टुगेदर’साठी एकत्र गोव्याला जायचा प्लॅन केला. मात्र प्रवासादरम्यानच त्यांच्यावर काळाने घाला घातला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं…
दरम्यान, या भीषण अपघातातून बचावलेल्या आशा जगदीश बेतुर यांनी अपघाताची भयकथा सांगितली आहे.
“जेव्हा अपघात झाला तेव्हा मी सर्वात शेवटच्या सीटवर झोपले होते. अपघातामुळे बसलेल्या जोरदार धक्क्याने मी काही वेळासाठी बेशुद्ध झाले. काही वेळाने मला जाग आली तेव्हा आजूबाजूला मैत्रिणींचे मृतदेह आणि बसचा मलबा पडला होता. काही वेळानंतर घटनास्थळी महामार्ग पोलीस आले आणि त्यांनी मदत कार्यास सुरुवात केली.” अपघातातून बचावलेल्या आशा बेतुर सांगतात.
आशा बेतुर या भीषण दुर्घटना झालेल्या ‘त्या’ मिनी-बसमधून आपल्या अन्य १६ मैत्रिणींसह प्रवास करत होत्या. बसमध्ये २ ड्रायव्हर देखील होते. हा अपघात एवढा भीषण होता की, यातील ११ महिला व २ ड्रायव्हर जागीच ठार झाले. बचावलेल्यांपैकी आशा वगळता इतरांची प्रकृती गंभीर आहे.
अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी सांगताना आशा बेतुर म्हणतात, “जेव्हा मी उठले तेव्हा स्वतःला सावरत माझा मोबाईल हाती घेतला. आम्ही धारवाड जवळ जेथे नाश्त्याला थांबणार होतो तेथे माझी चुलत बहीण मला भेटणार होती. तिला फोन करून मी घडलेली घटना सांगितली. ती आणि तिचे मित्र लगेचच मदतीसाठी धावून आले. मात्र अपघात एवढा भयानक होता कि पोलिसांनी मदतकार्य सुरु केल्यानंतरही त्यांना माझ्यापर्यंत पोहचायला बराच वेळ लागला. माझ्यासह अपघातात जखमी झालेल्या इतरांना पोलिसांना रुग्णालयात दाखल केलं.”
“आमच्यापैकी जवळपास सर्वच एकमेकींना शाळेत असल्यापासून ओळखत होतो. गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलो. दावणगिरी येथे आम्ही भेटत असू ट्रीपलाही जात असू. मात्र यावेळी आम्ही गोवा येथे रिसॉर्ट बुक केला होता. आम्ही रस्त्यात धारवाड जवळ नाश्त्यासाठी थांबणार होतो मात्र त्यापूर्वीच हा भीषण अपघात घडला.” त्या सांगतात.