बॉलिवूडचे दिग्गज ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा आज 7 एप्रिलला वाढदिवस. ‘जम्पिंग जॅक’ नावाने परिचित असलेल्या जितेंद्र यांचा जन्म पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला. आपल्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिलेल्या जितेंद्र यांची अभिनयाची शैली खूप वेगळी होती. अभिनयाव्यतिरिक्त जितेंद्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे एकेकाळी खूप चर्चेत आले होते. त्यांनी हवाई सुंदरी असलेल्या शोभा यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुले एकता कपूर आणि तुषार कपूर आहेत. खूप कमी लोकांना माहिती आहे की जर अभिनेते धर्मेंद्र मध्ये आले नसते तर जितेंद्र यांचे लग्न ‘ड्रिमगर्ल’ हेमा मालिनीशी झालेच असते ! काय होता हा किस्सा, जाणून घेऊया.
जितेंद्र हेमाशी लग्न करण्यास तयार झाले
हेमा मालिनी यांची बायोग्राफी ‘हेमा मालिनीः बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात नमूद केलेल्या मजकुरानुसार की धर्मेंद्र त्यांच्या पालकांना आवडत नव्हते. त्याच वेळी जितेंद्र हेमामालिनी यांच्या प्रेमात पडले होते. त्यांना हेमाशी लग्न करायचे होते. त्यावेळी जितेंद्र शोभा कपूरलादेखील डेट करत होते. पण जेव्हा हेमाशी लग्न करण्याचा विचार आला तेव्हा जितेंद्र ताबडतोब राजी झाले. तत्पूर्वी हेमा धर्मेंद्रशिवाय इतर कोणाशी लग्न करण्यास तयार नव्हती. परंतु तिच्या पालकांनी तिला जितेंद्र यांना भेटण्यासाठी तयार केले. त्यानंतर या दोघांनीही या लग्नास सहमती दर्शविली.
लग्न थांबवण्यासाठी धर्मेंद्र पोहोचले चेन्नईला
हेमा आणि जितेंद्रचे कुटुंब लग्नाच्या तयारीला लागले होते. या दोघांचे लग्न चेन्नई येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, एका वृत्तपत्रास या लग्नाची कुणकुण लागलीच. ही बातमी लगेच वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी धर्मेंद्रांपर्यंत पोहोचताच ते पूर्णपणे हादरले. मग काय, ते जितेंद्रची गर्लफ्रेंड शोभा यांना सोबत घेऊन लग्न थांबवण्यासाठी चेन्नईला रवाना झाले. धर्मेंद्र चन्नईला पोहोचले तेव्हा हेमाचे आई-वडील संतप्त झाले. त्यांनी धर्मेंद्र यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. धर्मेंद्र आधीच विवाहित होते आणि त्यांना चार मुले होती. या कारणामुळे हेमाचे आई-वडील त्यांची मुलगी धर्मेंद्र यांना सोपविण्यास तयार नव्हते.
हेमाने लग्नाला नकार दिला
पण धर्मेंद्र तिथून गेले नाहीत आणि शेवटी हेमाच्या पालकांनी हेमा आणि धर्मेंद्र यांना एकांतात बोलण्याची परवानगी दिली. खोलीबाहेर उभे असलेले सर्वजण हेमाच्या निर्णयाची वाट पाहत होते. थोड्यावेळाने हेमा बाहेर आल्या आणि त्यांनी जितेंद्रशी लग्न करण्यास नकार दिला. जितेंद्र यांना हा त्यांचा मोठा अपमान वाटला. त्यामुळे ते तेथून निघून गेले. यानंतर धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि हेमाशी पुनर्विवाह केला. त्याच वेळी जितेंद्रने 18 नोव्हेंबर 1974 रोजी शोभा कपूरसोबत लग्न केले.