जळगाव – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केल्याने राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून मुंडेंच्या बाजूने सावध भूमिका घेत त्यांना अभय दिले आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे बडे नेते गुलाबराव पाटील यांनी मुंडे निर्दोष सुटतील असा विश्वास आहे.
धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणातून नक्की निर्दोष सुटतील. त्यांचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा थेट आरोप शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ते जळगावमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारलं, त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच विरोधकांवर टीका केली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुंडे यांनी याआधीच या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी आपल्या आपत्यांबाबतही माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपात काही तथ्य असेल असं वाटत नाही. ते नक्कीच यातून निर्दोष सुटतील”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.